मुंबई; पुढारी वृत्तसेवा : केंद्र सरकारने आणलेला नवीन मोटार वाहन कायदा हा वाहन चालकांसाठी अत्यंत कठोर व जुलमी आहे. या कायद्यानुसार अपघात झाल्यास ट्रक चालकास दहा वर्षांची शिक्षा तसेच सात लाख रुपयांचा दंड भरावा लागणार आहे. या कायद्याविरोधात वाहन चालकांमध्ये तीव्र संताप असून टँकरचालकांनी संप पुकारला असून या संपाला काँग्रेसचा पाठिंबा आहे. वाहन चालकांवर अन्याय करणारा जुलमी नवीन मोटार वाहन कायदा रद्द करावा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. टिळक भवन येथे आज सोमवारी (दि.१) पत्रकारांशी ते बोलत होते.
पटोले पुढे म्हणाले, दुचाकी वाहन, टॅक्टर चालवण्यासही चालकांना भिती वाटावी, असा जुलमी, कठोर व अत्याचारी मोटर वाहन कायदा मोदी सरकारने आणला आहे. या कायद्यामुळे स्वत:चे वाहन चालवण्यासही लोकांना भिती वाटत आहे. आधीच्या कायद्यानुसार अपघात झाला तर १-२ वर्षांची शिक्षा व १ हजार रुपयांचा दंड होता. पण नवीन कायद्यानुसार १० वर्षांपर्यंत शिक्षा व ७ ते १० लाख रुपये दंडाची तरतूद आहे. तसेच हा कायदा आता अजामिनपात्र आहे. या कठोर कायद्याविरोधात जनतेत तीव्र नाराजी आहे. हा कायदा मंजूर करून घेण्यासाठीच मोदी सरकारने विरोधी पक्षांच्या १४६ खासदारांना निलंबित केले. या कायद्याला काँग्रेस पक्षाचा विरोध असून चालकांनी पुकारलेल्या संपाला पाठिंबा असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
हेही वाचा :