मुंबई; पुढारी वृत्तसेवा : तुमच्या दोन्ही पक्षांचे चांगले सहकार्य मिळाले. मात्र, माझ्या पक्षातीलच काहींनी दगा दिला. आमच्याच पक्षातील लोकांनी माझी साथ दिली नाही, अशी खंत मुख्यमंत्र्यांनी (Uddhav Thackeray) मंत्रिमंडळ बैठकीत बोलून दाखवली.
उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) सलग दोन दिवस मंत्रिमंडळ बैठक घेतली. गुरुवारी सरकारवरील विश्वासदर्शक ठराव मांडला जाणार आहे. सरकार पडले तर बुधवारची मंत्रिमंडळ बैठक अखेरचीच ठरणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठकीत निरोपाचेच भाषण केले. विशेषतः, पक्षातील बंडखोरीमुळे सरकार जात असल्याबद्दल त्यांनी आपली खंत बोलून दाखविली.
तुम्ही जे सहकार्य केले त्याबद्दल धन्यवाद, जी कायदेशीर प्रक्रिया असेल त्याला सामोरे जाऊ, मला माझ्याच लोकांनी धोका दिला म्हणून ही परिस्थिती निर्माण झाली आहे; पण आपण पुन्हाही मंत्रिमंडळ बैठकीत भेटू. ही काही शेवटची मंत्रिमंडळ बैठक नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले.
दरम्यान, बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला ते म्हणाले, राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना अशा वेगवेगळ्या विचारांचे पक्ष एकत्र आले. चांगले काम केले. सगळ्यांनी उत्तम प्रकारे सहकार्य केले त्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी सर्वांचे आभार मानले, असे ते म्हणाले.