पुढारी ऑनलाईन डेस्क : पावसाची सुरूवात म्हणजे केवळ उष्णतेपासून दिलासा नाही तर, अनेक संसर्गजन्य आजारांना देखील आमंत्रण असते. या ऋतूमध्ये अनेक संससर्गजन्य आजार डोके वर काढतात. या कालावधीत लहानांपासून अगदी मोठ्यांपर्यंत कोणीही आजारी पडू शकते. लहान मुलांमध्ये प्रतिकारशक्ती कमी असल्याने त्यांचे आजारी पडण्याचे प्रमाण हे सर्वाधिक असते. त्यामुळे पावसात होणाऱ्या संसर्गापासून मुलांना सांभाळणे पालकांची जबाबदारी (Monsoon health guide) आहे.
पावसाळ्यात हवेतील आर्द्रता वाढल्याने जिवाणू, विषाणूंच्या वाढीसाठी अनुकूल परिस्थिती असते. त्यामुळे याची मोठ्या प्रमाणात उत्पत्ती होत असते. याचा परिणाम म्हणजे या दिवसात डेंग्यू, मलेरिया, कॉलरा, टायफॉइड आणि अतिसार यांसारख्या डासांपासून पसरणारे आजार वाढतात. संसर्गजन्य आजारांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो. त्यामुळे मुलांमध्ये आजारी पडण्याचे प्रमाण देखील वाढते. म्हणून या ऋतुत पालकांनी मुलांची काळजी घेण्यासाठी 'या' टिप्स फॉलो (Monsoon health guide) करा.
पावसाळा आणि आरोग्य याविषयी कोल्हापूर येथील बालराेगतज्ज्ञ डॉ.मंदार पाटील यांनी 'पुढारी ऑनलाईन'शी बोलताना सांगितले की, पालकांनी पावसाळ्यात मुलांची काळजी घेणे गरजेचे आहे. कारण या दिवसांमध्ये मुलांची प्रतिकारशक्ती कमी झाल्याने ते वारंवार आजारी पडण्याची शक्यता अधिक असते. दरम्यान ०-२ वयोगटातील नवजात बालकांची आणि त्यांच्या मातांची अधिक काळजी घेतली पाहिजे. मातांनी स्वत:ची काळजी न घेतल्यास मोठ्या प्रमाणात संसर्गाचा धाेका मुल आणि बाळंतणीला होतो. नवजात मातांनी बालकांना नियमित स्तनपान करावे. यामुळे नवजात बालकांमधील रोगप्रतिकार क्षमता चांगली राहण्यास मदत होते. या दिवसात नवजात बालक आणि त्यांच्या मातांनी वेळेत लसीकरण करुन घेणे आवश्यक आहे. तसेच मातांनी आपल्या बालकाला हाताळताना स्वच्छता ठेवावी. नियमित हात स्वच्छ धुवावेत. या दिवसात पाणी २० मिनिटे उकळून मगच ते प्यावे.
पावसाळ्यांमध्ये मुलांना 'फ्लू' चा संसर्ग मोठ्या प्रमाणात होतो. त्यामुळे वयोगट ३-५ वर्षे तसेच पाच वर्षाच्या पुढील मुलांना शाळा सुरू होण्यापूर्वी फ्लू वॅक्सिन देणे आवश्यक आहे. मुले आजारी असल्यास त्यांना शाळेला न पाठवता घरीच विश्रांती घेऊ द्यावी. पालकांनी मुलांना पावसात भिजून देऊ नये. मुले जर फ्रिजमधील पदार्थ खात असतील तर पालकांनी फ्रिजमधील पदार्थ देणे टाळावे.
घराच्या आसपास सांडपाण्याचा निचरा व्यवस्थित होतो की नाही ते पाहावे. आसपास बांधकाम सुरू असल्यास पाणी साठू देऊ नये. तसेच मुलांना या दिवसात प्रोटीनयुक्त, न्यूट्रीशनयुक्त आहार देणे गरजेचे आहे. या दिवसात आजारी पडल्यास डिहायड्रेशन होऊ शकते, म्हणून मुलांना या दिवसात उकळलेले गरम पाणी गार करून पिण्यास द्यावे. तसेच मुलांच्या स्वच्छतेकडे देखील लक्ष द्यावे.
बालराेगतज्ज्ञ डॉ.मंदार पाटील (संगिता मुलांचे हॉस्पिटल, कोल्हापूर)