पुणे : विचारांशी फारकत घेऊन भाजपसोबत सत्तेत गेलेल्या लोकांनी यशवंतराव चव्हाण यांचा फोटो वापरण्यास सुरुवात केली आहे. मात्र, चव्हाण साहेबांचे केवळ फोटो वापरून चालणार नाही, तर त्यांचे विचार, कृती आणि कार्य आत्मसात करणे गरजेचे आहे, असा टोला कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी नाव न घेता अजित पवार गटाला लगावला आहे.( Ajit Pawar)
पुणे ते नागपूरदरम्यान आयोजित केलेल्या युवा संघर्ष यात्रेची माहिती देण्यासाठी आ. रोहित पवार यांनी सोमवारी पुण्यात पत्रकार परिषद घेतली. काही लोक शरद पवार यांच्या जवळ रहायचे, त्यांचे मार्गदर्शन घ्यायचे, आज मात्र ते विचारांशी व पवार साहेबांशी फारकत घेऊन वेगळे झाले. राजकीय पक्ष फोडण्याच्या आणि सुनावण्यांच्या चर्चांना आता महाराष्ट्रातील जनता कंटाळली आहे. त्यांच्या प्रश्नाकडे कोणाचे लक्ष नाही. त्यामुळे युवकांचे व जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी आम्ही युवा संवाद यात्रा काढत आहोत. या यात्रेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह सर्वच राजकीय नेत्यांनी सहभागी व्हावे, असे आपण आवाहन करीत असल्याचेही आ. रोहित पवार म्हणाले.(Rohit Pawar)
पुणे ते नागपूरदरम्यान 25 ऑक्टोबरपासून काढण्यात येणारी 42 दिवसांची 'युवा संघर्ष यात्रा' 800 किलोमीटरचा प्रवास करणार आहे. या यात्रेचा प्रारंभ आणि सांगता शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात येणार आहे.
हेही वाचा