शित्तूर-वारूण: पुढारी वृत्तसेवा; चांदोली धरण परिसरामध्ये शुक्रवारी (दि. २६) पहाटे दोनवेळा भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. मध्यरात्री ०२ वाजून २२ मिनिटांनी जाणवलेल्या भूकंपाची तीव्रता ही ३.४ रिश्टर स्केल होती, तर पहाटे ७ वाजता जाणवलेल्या भूकंपाची तीव्रता ही ३.१ रिश्टर स्केल इतकी होती. या भूकंपाचा केंद्रबिंदू धरणापासून पश्चिमेस २०० किलोमीटर अंतरावर असल्याचे भूकंपमापन केंद्राकडून सांगण्यात आले आहे.
हा भूकंप सौम्य असल्याने यामध्ये कोणतीही जीवित अथवा वित्तहानी झालेली नसल्याचे येथील अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
एकाच दिवशी जाणवलेल्या भूकंपाच्या या सौम्य धक्क्यांमुळे परिसरामधील नागरिकांच्यात भीतीचे वातावरण पसरले आहे. या भूकंपाच्या धक्य्यांमुळे धरणाला कोणत्याही प्रकारची झळ लागली नसल्याचे शाखाधिकारी गोरख पाटील यांनी यावेळी सांगितले.