पुढारी ऑनलाईन डेस्क : उद्धव ठाकरे यांना मराठा आरक्षणावर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही, त्यामुळे त्यांनी यावर बोलू नये. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना आरक्षण दिले होते; पण ते मविआ सरकारला टीकवता आले नाही. पुढे आरक्षण टिकवण्यात तेव्हाचे सरकार कमी पडले. त्यानंतर मराठा आरक्षणाला आम्ही सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. मराठा आरक्षणाचे मारेकरी तुम्हीच आहात, असा घणाघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर केला. राज्य सरकारच्या कॅबिनेट बैठकीनंतर ते आज (दि.३१) माध्यमांशी बोलत होते. (Maratha reservation)
या वेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, आमचे सरकार मराठा आरक्षण देण्यासाठी कटिबद्ध आहे. ज्याच्याकडे कुणबी नोंदी असेल त्यांना प्रमाणपत्र मिळेल. मनोज जरांगे-पाटील यांनी स्वतःच तब्येतीची काळजी घ्यावी. क्युरेटिव्ह पीटिशन दाखल केली आहे. मराठा समाज हा शिस्तप्रिय आहे. त्यामुळे शांततापूर्ण आंदोलन करावे. त्याला कुठेही गालबोट लागू नये. हिंसात्मक आंदोलन करू नको, असे आवाहन देखील शिंदे यांनी केले. (Maratha reservation)
मनोज जरांगे-पाटील यांच्या भूमिकेशी आम्ही सहमत आहे. त्यामुळे मराठा समाजातील युवकांनी टोकाचे पाऊल उचलू नये. शांततेत आंदोलन करावे. विरोधी पक्षाच्या नेत्यांनी राजकीय सुडबुद्धीने आंदोलकांना भडकवण्याचे काम करू नये, असे आवाहन देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. (Maratha reservation)
राज्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आमचे सरकार प्रयत्नशील आहे. राज्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर सरकारचे पूर्ण लक्ष आहे. मराठा आरक्षण हे पूर्ण पुरावे आणि कायद्याच्या कक्षेत राहून देणे सरकारचे कर्तव्य आहे. यासाठी आम्ही युद्धपातळीवर काम करत आहोत, असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.