पुढारी ऑनलाईन डेस्क : आमचा संयम सुटू देऊ नका, आमच्या कुटुंबातील एक सदस्य कमी झाला आहे. मराठा समाजाच्या पोरांचे मुडदे पडायला लागले आहेत. सुनील कावळे यांच्या मृत्यूला सरकार जबाबदार असे, असा गंभीर आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. जुन्नरमध्ये ते बोलत होते.
जगात आमच्यासाठी शिवनेरीपेक्षा मोठं आणि पवित्र क्षेत्र असूच शकत नाही. मी आज शिवनेरी किल्ल्यावरून जाहिरपणे सांगतो की, आमची मुलं जीवन संपवत आहेत. याला सर्वस्वी सरकार जबाबदार असेल. मराठा समाजाची पोरं हट्ट धरायला लागले आहेत, सरकारने मराठा आरक्षणाचा विषय गांभीर्याने घ्यावा, आम्ही एकही बलिदान वाया जाऊ देणार नाही. असे मनोज जरांगे पाटील यावेळी म्हणाले.
मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी आंतरवाली सराटीनंतर आज पुणे जिल्ह्यातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळ असलेल्या जुन्नरच्या शिवनेरी गडावरून शिवाजी महाराजांना अभिवादन करुन मॅराथॉन सभेला सुरुवात करणार आहेत. शिवनेरीची माती कपाळाला लावून अन्याया विरोधात लढण्यासाठी पुन्हा एकदा तयार होत आहे, असं ते म्हणाले. त्यासोबतच आम्ही कोणाच्या बालेकिल्ल्यात नाही तर मराठे जिथं असेल तिथं आम्ही सभा घेतो, असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.
मराठा समाजाच्या आरक्षणासाठी काल आपल्या बांधवाने टोकाचं पाऊल उचलत जीवन संपवलं आहे. आपल्या परिवारातील एक सदस्य गेला आहे. सुनील कावळे यांच्या जाण्याचं आपल्या सर्वांनाच दुःख असलं पाहिजे. त्याचं स्वप्न होतं की, माझ्या गोरगरीब मराठा बांधवाना आरक्षण मिळावं. त्यामुळे आज आपल्याला हार-फुलं काहीच घ्यायचं नाही. असे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं.
हेही वाचा