पुढारी ऑनलाईन : गेले दीड महिन्यांपासून मणिपूरमध्ये हिंसाचार आणि तणावाचे वातावरण कायम आहे. दिवसेंदिवस येथील हिंसाचाराच्या घटनांमध्ये वाढच होत आहे. दरम्यान, सुरक्षेच्या कारणास्तव पुन्हा एकदा मणिपूरमधील इंटरनेट सेवेवर ३० जूनच्या दुपारपर्यंत बंदी (Manipur Violence) घालण्यात आली आहे.
मणिपूरात गेल्या दीड महिन्यांपासून सुरू असलेल्या हिंसाचारात आत्तापर्यंत १०० हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, राज्याच्या अधिकारक्षेत्रात शांतता आणि सार्वजनिक सुव्यस्थेला कोणत्याही प्रकारे अडचण होऊ नये, म्हणून शुक्रवार (३० जून) दुपारी ३ वाजेपर्यंत इंटरनेट बंदी घालण्यात आली आहे, असे वृत्त (Manipur Violence) 'एएनआय'ने दिले आहे.
शांतता प्रस्थापित करण्यासाठी शुक्रवारी अनेक जिल्ह्यांमध्ये शोधमोहीम सुरूच होती. सुरक्षा दलांच्या संयुक्त शोध मोहिमेत आतापर्यंत एकूण 1,095 शस्त्रे, 13,702 दारूगोळा आणि विविध प्रकारचे 250 बॉम्ब जप्त करण्यात आले आहेत. मुख्यमंत्री एन. बीरेन सिंग यांनी म्हटलं हाेतं की, पोलीस आणि केंद्रीय दले लवकरच एसओओ गट आणि करारांचे उल्लंघन करणाऱ्या सर्व सशस्त्र गटांविरुद्ध संयुक्त कारवाई सुरू करतील.