पुढारी ऑनलाईन डेस्क: मणिपूरमध्ये हिंसाचार थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. पुन्हा एकदा नववर्षाच्या पहिल्याच दिवशी राज्यातील थौबलमध्ये चार जणांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या हिंसाचारात अनेक जण जखमीही झाले आहेत. यानंतर खोऱ्यातील जिल्ह्यांमध्ये पुन्हा संचारबंदी लागू करण्यात आली. (Manipur violence)
थौबल जिल्ह्यातील स्थानिकांनी दावा केला की लोकांचा एक गट, ज्यांची अद्याप ओळख पटलेली नाही, ते खंडणीसाठी स्वयंचलित शस्त्रे घेऊन आले होते. या घटनेनंतर मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांनी एका व्हिडिओ संदेशात हिंसाचाराचा निषेध केला आणि लोकांना शांतता राखण्याचे आवाहन केले. (Manipur violence)
पुढे मुख्यमंत्री म्हणाले, "निरपराध लोकांच्या हत्येबद्दल मी अत्यंत दु:ख व्यक्त करतो. गुन्हेगारांना पकडण्यासाठी पोलीस पथके तैनात केली आहेत. मी जिथे घटना घडली तेथील रहिवाशांना आवाहन करतो की, गुन्हेगारांना पकडण्यात सरकारला मदत करा. मी वचन देतो की सरकार कायद्यानुसार न्याय देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेल." (Manipur violence)
२०२३ मध्ये मणिपूर नेहमी चर्चेत राहिले. ३ मे रोजी येथे सर्वात हिंसक घटना घडली. राज्यातील विविध घटनांमध्ये १८० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून सुमारे ६० हजार लोक बेघर झाले आहेत.
मणिपूरच्या मोरेह शहरात मंगळवारी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात चार पोलीस कमांडो आणि सीमा सुरक्षा दलाचा (बीएसएफ) एक जवान जखमी झाला. थौबल जिल्ह्यातील लिलोंग परिसरात अज्ञात सशस्त्र हल्लेखोर आणि स्थानिक यांच्यात झालेल्या संघर्षात चार नागरिकांचा गोळ्या झाडून मृत्यू झाल्याच्या एका दिवसानंतर ही घटना घडली आहे.
म्यानमार सीमेजवळ असलेल्या मोरेह येथे जात असताना बंदुकधाऱ्यांनी पोलीस कमांडो वाहनांना लक्ष्य केले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरक्षा दलाचे जवान सर्च ऑपरेशन राबवत असताना बंदूकधाऱ्यांनी आरपीजींवर गोळ्या झाडल्या.