पुढारी ऑनलाईन डेस्क : "कोणाचा पोपट मेला हे निश्चितपणे सांगता येणार नाही. परंतु महाराष्ट्राच्या विकासाचा, युवकांच्या भविष्याचा, सर्वसामान्यांच्या स्वप्नांचा, आशा-आकांक्षांचा पोपट मेला हे मात्र निश्चितपणे खरं आहे." असं ट्विट करत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांनीही 'पोपट' प्रकरणात उडी घेतली. महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर ठाकरे गट, भाजप नेत्यांच्या प्रतिक्रियांमध्ये 'पोपट' शब्द वारंवार येऊ लागला आहे. कोणाचा कसा 'पोपट' झाला यावर सातत्याने एकमेकांवर टिका होत आहे. यामध्ये आता रोहित पवार यांनीही उडी घेतली आहे. जाणून घ्या नेमके हे पोपट प्रकरण काय आहे. (Maharashtra Politics)
गेले काही दिवस महाराष्ट्राच्या राजकारणात 'पोपट' हे प्रकरण खूप चर्चेत आहे. आता राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी ट्विट करत या प्रकरणात उडी मारली आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, "राजकीय वक्तव्ये करताना दोन्ही बाजूंनी पोपट मेल्याची वक्तव्ये करण्यात येत आहेत. कोणाचा पोपट मेला हे निश्चितपणे सांगता येणार नाही. परंतु महाराष्ट्राच्या विकासाचा, युवकांच्या भविष्याचा, सर्वसामान्यांच्या स्वप्नांचा, आशा-आकांक्षांचा पोपट मेला हे मात्र निश्चितपणे खरं आहे. कुणावर टीका करायची नाही पण सध्याची राजकीय परिस्थिती बघता जनतेला पोपट बनवलं जात असल्याची भावना सर्वसामान्यांमध्ये दृढ होत आहे, हे मात्र नक्की!"
गेले काही दिवस चर्चेत असणारा आणि महाराष्ट्रासह देशाचे लक्ष लागून राहिलेला सत्तासंघर्षाचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने नुकताच निकाल दिला. या निर्णयावर बोलत असताना उद्धव ठाकरे म्हणाले होते की,"पोपट हलत नाही, निश्चल आहे. त्याने डोळे मिटलेले आहेत. चोच उघडत नाही. श्वासही घेत नाहीये. हे वर्णन करून पोपट मेलेला आहे हे जाहीर करण्याचं काम सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांवर सोपवलं आहे.