पुढारी ऑनलाईन डेस्क : "महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार धीरज लिंगाडे अमरावती पदवीधर मधून विजयी झाल्याबद्दल व मविआ सोबतच या विजयामध्ये अकोल्यातील भाजपमधील अदृश्य शक्तींनी सहकार्य केल्याबद्दल मनस्वी आभार व मनःपूर्वक अभिनंदन. मविआ एकत्र राहिली तर विदर्भामध्ये भाजपचा धुरळा झाल्याशिवाय राहणार नाही." असं ट्विट करत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी पदवीधर निवडणुकीत मदत केलेल्या भाजप नेत्यांचे आभार मानले आहे. त्यांच्या या ट्विटनंतर राजकीय वर्तूळात चर्चा रंगू लागल्या आहेत. (Maharashtra MLC Election )
नागपूर, औरंगाबाद आणि कोकण अशा एकूण चार पदवीधर-शिक्षक मतदारसंघांचा काल (दि.२) निकाल लागला. राज्यात सत्तापालट झाल्यानंतर पहिल्यांदाच झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपला जबरदस्त धक्का बसला आहे. विजयाचे हुकमी एक्के समजल्या जाणाऱ्या नागपूर शिक्षक पदवीधर मतदारसंघात या पक्षाचे उमेदवार पराभूत झाले.
देवेंद्र फडणवीस यांचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या नागपूर विभाग शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार सुधाकर अडबाले यांनी दणदणीत विजय संपादन केला आहे. भाजप समर्थित आमदार नागो गाणार यांचा अडबाले यांनी पराभव केला. महाविकास आघाडीचे समर्थन असलेल्या सुधाकर अडबोले यांनी १६, ७०० मते मिळवली. तर भाजप पुरस्कृत उमेदवार नागो गाणार यांना ८,२११ मते मिळाली.
तर अमरावती विभागीय पदवीधर मतदारसंघातून महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार धीरज रामभाऊ लिंगाडे यांना सर्वाधिक मते मिळाली आहेत. यामुळे मविआचे धीरज लिंगाडे यांचा विजय झाला असून निवडणूक आयोगाकडून केवळ विजयाच्या घोषणेची औपचारिकता शिल्लक आहे. विजयासाठी निश्चित केलेला ४७ हजार १०१ मतांचा कोटा कोणत्याच उमेदवाराने पूर्ण केला नाही. त्यामुळे सर्वाधिक मते घेणारे लिंगाडे यांनी भाजपचे उमेदवार तसेच माजी मंत्री डॉ. रणजीत पाटील यांचा पराभव केला. बाद फेरी अखेर मविआचे धीरज लिंगाडे यांनी ४६ हजार ३४४ मते प्राप्त केली. तर रणजीत पाटील यांना ४२ हजार ९६२ मते मिळाली.
यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी एक ट्विट केले आहे. या ट्विटची चर्चा सोशल मीडियासह राजकीय वर्तुळात होऊ लागली आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये अस म्हंटल आहे की,""महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार धीरज लिंगाडे अमरावती पदवीधर मधून विजयी झाल्याबद्दल व मविआ सोबतच या विजयामध्ये अकोल्यातील भाजपमधील अदृश्य शक्तींनी सहकार्य केल्याबद्दल मनस्वी आभार व मनःपूर्वक अभिनंदन मविआ एकत्र राहिली तर विदर्भामध्ये भाजपचा धुरळा झाल्याशिवाय राहणार नाही."
हेही वाचा