पुढारी ऑनलाईन डेस्क : राज्यातील १२ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारित यादी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जाहीर केली. यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा गट वरचढ ठरला आहे. या सुधारित यादीनुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद देण्यात आले आहे. तर हसन मुश्रीफ यांची कोल्हापूरच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती केली आहे. या निवडीनंतर मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी आपल्या 'X' अकाउंटवर "अप्पलपोटी सत्ताग्रही…तुम्ही तुमचेच बघा..!" अशा आशयाची पोस्ट करत सरकारवर घणाघाती हल्ला केला आहे.
वर्षा गायकवाड यांनी राज्यातील आरोग्य व्यवस्थेमुळे होणारे मृत्यू, महागाई, गरीबी, शिक्षक आंदोलन, बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या समस्या यावर भाष्य करत नुकत्याच झालेल्या पालकमंत्री निवडीवर "अप्पलपोटी सत्ताग्रही.. तुम्ही तुमचेच बघा..!" अशा शब्दात जोरदार टीका केली आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की,"
"अप्पलपोटी सत्ताग्रही.. तुम्ही तुमचेच बघा..!
ढासळलेल्या आरोग्य व्यवस्थेमुळे महाराष्ट्रात मृत्यूचे तांडव सुरु आहे. महागाईच्या आगडोंबात गोरगरीब पोळून निघतोय, कर्जापायी शेतकरी हवालदिल झालाय, शिक्षक आंदोलन करताहेत, बेरोजगार रोजगार मांगताहेत. पण इकडे सर्वसामान्य जनतेचे काहीही होवो, यांना केवळ स्वतःचे हित साधायचे माहिती आहे. एकमेकांवर कुरघोड्या करण्यातच यांना धन्यता वाटते. ह्या असंवेदनशील सरकारला फक्त सत्तेची समीकरणे जुळवायची कशी यात रस आहे. कुणाला मुख्यमंत्री व्हायचे आहे तर कुणाला पालकमंत्री. पक्के स्वार्थी सरकार. यांना जनतेच्या प्रश्नांशी काहीही देणेघेणे नाही. बस्स आपले हात तुपात बुडाले ना. बाकी मरो. असे हे भावनाशून्य तिकडी सरकार."
हेही वाचा