पुढारी ऑनलाईन डेस्क
शिराळा (जि. सांगली) येथील दंडाधिकारी न्यायालयाने ६ एप्रिल रोजी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केले होते. न्यायालयाने मुंबई पोलीस आयुक्तांना अजामीनपात्र वॉरंटमध्ये राज ठाकरे यांना अटक करून न्यायालयात हजर करण्यास सांगितले होते. पण मुंबई पोलिसांनी अद्याप या आदेशाची अंमलबजावणी केलेली नाही.
राज ठाकरे यांच्या विरोधात २००८ मधील एका प्रकरणात अजामीनपात्र वॉरंट जारी केले होते. आयपीसी १४३, १०९, ११७, ७ मधील फौजदारी दुरुस्ती आणि मुंबई पोलिस कायद्यातील १३५ नुसार हे वॉरंट बजावण्यात आले होते.
राज ठाकरे यांनी रेल्वे भरतीत स्थानिकांना प्राधान्य देण्याच्या मागणीसाठी आंदोलन केले होते. या प्रकरणी न्यायालयाच्या आदेशानुसार राज ठाकरे यांना अटक झाली होती. या अटकेचा निषेध राज्यातील ठिकठिकाणी मनसे कार्यकर्त्यांनी नोंदवला होता. शिराळा तालुक्यातील शेडगेवाडी गावात मनसे कार्यकर्त्यांनी बंद पुकारला होता. त्यांनी जबरदस्तीने दुकाने बंद करण्यासाठी दुकानदारांवर दबाव टाकला होता. या प्रकरणी शिराळा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता. तसेच पोलिसांनी शिराळा प्रथमवर्ग न्यायालयात राज ठाकरे यांच्यासह काही मनसे कार्यकर्त्यांविरुद्ध आरोपपत्र दाखल केले होते. पण ते सुनावणीला हजर राहिले नव्हते. यामुळे राज ठाकरेंना शिराळा न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट बजावले होते.
याआधी राज ठाकरे हे जामीन करुनही सतत तारखेला गैरहजर राहिल्यामुळे त्यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट काढण्याचा आदेश परळी न्यायालयानेदेखील दिला होता. २००८ रोजी राज ठाकरे यांना मुंबई येथे अटक करण्यात आली होती. याचा परळी येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी निषेध केला होता. दरम्यान, त्यांनी सार्वजनिक परिवहन महामंडळाच्या बसेवर धर्मापुरी पाईंटवर परळी येथे बेकायदेशीर जमाव जमवून दगडफेक केली होती. बसच्या समोरील काच फोडुन सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केले व जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केले. त्यास राज ठाकरे यांनी चिथावणी दिली होती.
याविरोधात परळी ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये राज ठाकरे व त्यांचे कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. 208/2008 अन्वये गुन्हा कलम 143, 427, 336, 109 भारतीय दंडसंहितेनुसार नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.