ठाणे/नवी मुंबई : पुढारी वृत्तसेवा
पडघा येथील उपकेंद्रात बिघाड झाल्याने मुंबईला वीजपुरवठा करणाऱ्या कळवा पडघा १ आणि २ फीडिंगच्या ४००kv लाईन ट्रिप झाल्या. त्यामुळे ठाणे, मुलुंड, कल्याण डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर येथील ग्राहकांचा सकाळी १०:०८ च्या सुमारास अचानक वीज पुरवठा खंडित झाला. परिणामी वीज ग्राहकांची मोठी पंचाईत झाली. मात्र महापारेषणने युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम हाती घेतल्याने अर्धा तासात वीज पुरवठा सुरळीत झाला. या अनुषंगाने घामाघूम झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला. तसेच महिला वर्गाची मोठी गैरसोय दूर झाली.
भिवंडी तालुक्यातील पडघा येथील महापारेषणच्या ४०० KV उपकेंद्रात बिघाड (बस ट्रिप) झाल्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला. पडघा ते पालघर २२० KV उच्चदाब वाहिनीवर वीजपुरवठा असणाऱ्या महावितरणच्या ठाणे व मुलुंड येथील काही ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित झाला.
त्याचबरोबर टेमघर, पाल, वाडा, कळंबा, वसई, कोलशेत, कलरचेम, आनंदनगर, जांभूळ, पालवा उपकेंद्राला ही भारनियमनाचा फटका बसला. त्यानुसार टप्प्याटप्प्याने ४००kV चा वीज पुरवठा साडेदहा वाजता, २२०kV चा पुरवठा १०:३४ वाजता पूर्ववत झाला . तसेच १००kV वीज पुरवठा १०:४९ वाजता पूर्ववत झाल्याने सर्व उपकेंद्राचा ११:०८ दरम्यान पूर्णत: वीज पुरवठा सुरळीत सुरू झाला. असे असले तरी पडघा येथील महापारेषणच्या ४०० केव्ही उपकेंद्रांमध्ये कशामुळे बिघाड झाला. हे अद्यापी गुलदस्त्यात असून याबाबत मात्र महापारेषणचे कोणतेही अधिकारी बोलण्यास तयार नाहीत. मुंबईला वीज पुरवठा करणाऱ्या ४००KV च्या वाहिन्यांवर यापूर्वीही बिघाड होऊन मुंबई अंधारात बुडाल्याच्या घटना घडल्या आहेत.
सध्या महापारेषणकडून युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम सुरू आहे. महावितरणचे वरिष्ठ अधिकारी या भागाचा वीजपुरवठा तातडीने सुरू व्हावा, यासाठी परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहेत. हळूहळू वीजपुरवठा सुरू होत आहे. पडघा मेन लाईन ट्रिप झाल्यामूळे सर्व अंबरनाथ, कल्याण, उल्हासनगर, बदलापूर येथील व इतर बऱ्याच भागातील वीज पुरवठा बंद आहे. पुढील माहिती मिळताच कळविण्यात येईल. असे सांगण्यात आले आहे.
महावितरणच्या वीज उपकेंद्रातील बिघाडामुळे मुंबईतील शिवाजी पार्क येथील राज्यपालांच्या कार्यक्रमातदेखील वीज पुरवठा खंडित झाला. राज्यपालांच्या उपस्थितीत स्काऊट गाईड राज्य पुरस्कार सोहळा आयोजित केला होता. त्याच दरम्यान वीज पुरवठा खंडित झाला.