विशाळगड : सुभाष पाटील शाहूवाडीकरांची तहान भागविणा-या कडवी खोऱ्यातील परळे निनाई येथील कडवी धरणात आजमितीला ५४.७५ टक्के इतका पाणीसाठा आहे. जुलै अखेर पर्यंत पुरेल एवढा हा पाणीसाठा असून, गतवर्षीच्या आजच्या तारखेला १.१६ टीएमसी म्हणजे ४९.०३ टक्के पाणीसाठा होता. गतवर्षीच्या तुलनेत सहा टक्के जादा पाणीसाठा आहे अशी माहिती पाटबंधारे विभागाचे उत्तम मोहिते यांनी दिली.
कडवी भागातील विविध गावांचा पाण्याचा मुख्य स्रोत असलेल्या कडवी धरणामध्ये यंदा एप्रिल अखेरपर्यंत दिलासादायक पाणीसाठा आहे. यावर्षी पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस झाल्याने तब्बल तीनदा धरण शंभर टक्के भरले होते. पाणलोट क्षेत्रात यंदा ३ हजार ७६३ मिली मीटर पावसाची नोंद झाली. तर, गतवर्षी ३ हजार ८७२ मिमी पावसाची नोंद झाली होती. गेल्यावर्षीपेक्षा १०९ मिमी कमी पावसाची नोंद झाली आहे. ९ ऑगस्ट रोजी पहिल्यांदा, १६ सप्टेंबर रोजी दुसऱ्यांदा आणि १२ ऑक्टोबर रोजी तिसऱ्यांदा कडवी धरण ओव्हर फ्लो झाले होते. ९ फेब्रुवारी २०२३ रोजी कडवी धरणात ७७ टक्के पाणीसाठा शिल्लक होता. ५ एप्रिल रोजी तो ५५ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिल्याने ५५ दिवसांत २२ टक्के पाणीसाठा कमी झाला आहे.
धरण २.५१ टीएमसीचे
कडवी धरणाची पाणी साठवण क्षमता ७१.२४० दलघमी ( २.५१ टीएमसी) असून, दरवर्षी १०० टक्के धरण भरते. गतवर्षी धरण तीनदा ओव्हर फ्लो झाले होते. सध्या धरणात बुधवारी (दि ५) रोजी सकाळी ७ वाजता धरणाची पाणीपातळी ५९३.५५ मीटर होती. शिल्लक पाणीसाठा ३९.३१२ दलघमी ( १.३८ टीएमसी) असून, धरण ५५ टक्के भरले आहे. परळे निनाई ते पाटणे दरम्यानच्या २३ गावांतील शेतकऱ्यांना सिंचनासाठी व पिण्यासाठी महिन्याकाठी सुमारे दहा ते बारा टक्के पाणी लागते. त्यामुळे पावसाळ्यापर्यंत या भागातील गावांना पाणी टंचाई भासणार नसल्याचे पाटबंधारे विभागाचे म्हणणे आहे.
२३ गावे आठ बंधारे
कडवी धरणावर परळे निनाई, भेंडवडे, लोळाणे, पुसार्ले, आळतुर, वारूळ, करुंगळे, निळे, कडवे, येलूर, पेरिड, भोसलेवाडी, गाडेवाडी, मलकापूर, कोपार्डे, सांबु, शिरगाव, ससेगाव, सावर्डे, मोळवडे, सवते, शिंपे, पाटणे ही २३ गावे अवलंबून आहेत. शिवाय मलकापूर नगरपालिका व उदय साखर कारखाना या दोन्ही ठिकाणी पाणी जास्त लागते. या नदीवर पाणी साठवणुकीसाठी वालुर, सुतारवाडी, करुंगळे, भोसलेवाडी, पेरिड, शिरगाव, सावर्डे, पाटणे या आठ ठिकाणी कोल्हापूर पद्धतीचे बंधारे असून, प्रत्येक बंधाऱ्यावर पाणी अडवल्याने नदीपात्रात पाणीसाठा भरपूर आहे. गतवर्षीही कडवी नदी काठावरील गावांना पाणी टंचाईचा सामना करावा लागला नाही.
कडवी धरणात आजमितीला ५५ टक्के इतका पाणीसाठा आहे. जुलै अखेरपर्यंत पुरेल एवढा हा पाणीसाठा आहे. धरणातील पाणीसाठा पुरेसा असला तरी, आता उन्हाळा वाढू लागला आहे. त्यामुळे पाण्याचा वापर वाढेल. कडक उन्हाच्या बाष्पीभवनामुळे धरणातील पाणीसाठ्यात घट होईल. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करावा. जेणेकरुन पुढील काळात पाणीटंचाईला सामोरे जावे लागू नये.
अजय पुनदीकर (शाखा अभियंता, कडवी धरण)
मध्यम व लघुमध्यम प्रकल्प व उपलब्ध पाणीसाठा असा –
मध्यम प्रकल्प उपलब्ध पाणीसाठा टक्के
कडवी ३९.३१२ दलघमी ५५ %
मानोली २.५४७ दलघमी ५० %
पालेश्वर धरण ४८९३ दलघमी ५५ %
हेही वाचा :