पुढारी ऑनलाईन डेस्क : किमान हमी भाव आणि अन्य मागण्यांसाठी देशभरातील शेतकऱ्यांनी आज पुन्हा दिल्लीकडे मोर्चा वळवला आहे. शेतकऱ्यांच्या आजच्या निषेध मोर्चाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांनी टिकरी, सिंघू आणि गाझीपूर सीमा, रेल्वे आणि मेट्रो स्थानकांवर पाळत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
शेतकरी नेते तेजवीर सिंह यांनी सांगितले की, आज म्हणजेच ६ मार्च रोजी संपूर्ण भारतातील शेतकरी दिल्लीतील जंतरमंतरकडे शांततेने मोर्चा काढणार आहेत. मध्य प्रदेश, राजस्थान आणि बिहारमधील शेतकऱ्यांनी मोर्चासाठी दिल्लीला जाण्याची पूर्ण तयारी केली आहे. शेतकऱ्यांच्या घोषणेनुसार पंजाब आणि हरियाणा वगळता इतर राज्यातील शेतकरी शांततेत दिल्लीकडे मोर्चा काढणार आहेत.
युनायटेड किसान मोर्चा, बीकेयू उग्रहण, क्रांतीकारी किसान युनियन आणि बीकेयू डकौंडा (धानेर) या प्रमुख गटांनी मंगळवारी पटियाला येथील पुड्डा मैदानावर भव्य रॅली काढली. यावेळी मोठ्या संख्येने जमलेल्या शेतकऱ्यांनी केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत एमएसपीच्या कायदेशीर हमीसह इतर सर्व मागण्या तातडीने पूर्ण करण्याचे आवाहन केले. मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला.
हेही वाचा :