पुढारी ऑनलाईन डेस्क: प्रभू श्री राम शाकाहारी नव्हते, असे वक्तव्य शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी एका कार्यक्रमात केले. या विधानावर राज्यभर पडसाद उमटत आहेत. यावरून रोहित पवार यांनी देखील जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्यावर "देव धर्माच्या नावावर जे राजकारणाचा बाजार करतात त्यांना ते लखलाभ" अशी टीका केली. यावर बोलताना जितेंद्र आव्हाड यांनी रोहीत पवार यांना घरचाच आहेर दिला आहे. ते आज (दि.४) शिर्डी येथे पत्रकार परिषदेत बोलत होते. (Jitendra Awhad On Rohit Pawar)
राेहित पवारांच्या टीकेला उत्तर देताना आव्हाड म्हणाले, "रोहित पवार अजून लहान आहेत, त्यांना मी महत्त्व देत नाही. त्यामुळे रोहित पवार काय बोलतात त्याला मी महत्त्व देत नाही. सामाजिक भाष्य करताना, पक्षाचा विषय येतच नाही." (Jitendra Awhad On Rohit Pawar)
आज नको त्या विषयावर बोलून वाद ओढवून घेण्यापेक्षा राज्यातील वाढती बेरोजगारी, ढासळलेली कायदा व सुव्यवस्था, महिलांची सुरक्षितता, शेतमालाला भाव नसणं, महाराष्ट्रातील उद्योग गुजरातमध्ये पळवणं, जाती-जातींमध्ये निर्माण केला जाणारा तणाव या ज्वलंत विषयांवर बोलून सरकारला धारेवर धरण्याची अधिक गरज आहे. (Jitendra Awhad On Rohit Pawar)
देव आणि धर्म हा प्रत्येकाचा व्यक्तिगत विषय असून. याबाबत प्रत्येकाची श्रद्धा असल्याने कुणीही याचं राजकारण करू नये; पण देव धर्माच्या नावावर जे राजकारणाचा बाजार करतात त्यांना ते लखलाभ. अशा राजकीय व्यापाऱ्यांना जनता चोख उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळं देव या विषयावर अनावश्यक बोलून विरोधकांच्या सापळ्यात न अडकण्याचं भान सर्वांनीच ठेवलं पाहिजे, अशी एक नागरिक म्हणून माझी भावना आहे, असेही राेहित पवारांनी स्पष्ट केले हाेते.
प्रभू रामासंदर्भातील वादग्रस्त वक्तव्याचा 'वाल्मिकी रामायणात' उल्लेख असल्याचे जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्ट केले आहे. तसेच मी कोणतेही भाष्य अभ्यासाशिवाय करत नाही. आजकाल अभ्यासाला महत्त्व नाही, तर भावनेला महत्त्व आहे. यावरून आजकाल (दि.४) अभ्यासाला नाही तर भावनेला अधिक महत्त्व आहे. त्यामुळे माझ्या कालच्या वक्तव्यामुळे कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर, मी खेद व्यक्त करतो, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषदेदरम्यान बोलताना रामभक्तांची माफी मागितली. ते शिर्डीतून आज (दि.४) पत्रकार परिषदेत बोलत होते. (Jitendra Awhad)
इतिहासाचा मी विपर्यास कधीच करत नाही. कालचं वाक्य मी ओघानं बोललो. प्रभूरामांवरी वाद मला वाढवायचा नाही. वाल्मिकी रामायणातील कंदांचा आव्हाडांनी संदर्भ दिला आणि त्यांनी केलेल्या वक्तव्याला पुष्टी देणारे या संदर्भातील पुरावे माध्यमांशी बोलताना सांगितले. (Jitendra Awhad)
राम बहुजनांचा आहे, राम हा आमचा आहे. राम क्षत्रीय आहे. शबरींची बोरं खाणारा आमचा राम आहे. त्यामुळे माझ्यावर गुन्हा दाखल झाला तरी घाबरत नसल्याचे देखील जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी बोलताना म्हटले आहे.