गुवाहाटी पुढारी वृत्तसेवा : छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणादायी चरित्रावरील महानाट्य 'जाणता राजा'चा प्रयोग आसाममध्ये आयोजित करणार असल्याची माहिती आसामचे मुख्यमंत्री हेमंता बिस्वा सरमा यांनी दिली. जाणता राजा नाट्याच्या धर्तीवर आसामाचे योद्धे लचित बरफुकन यांचे चरित्र जगासमोर मांडण्यासाठी शिवचरित्राचा अभ्यास करण्याचा मानस असल्याचेही शर्मा यांनी सांगितले. (Janata Raja)
महाराष्ट्रातील पत्रकारांसोबत संवाद साधताना आसामचे मुख्यमंत्री शर्मा यांनी महाराष्ट्र आणि आसाम राज्यांतील सांस्कृतिक संबंध दृढ करण्याचा मानस व्यक्त केला. शिवचरित्रातुन लोकांना प्रेरणा मिळते. छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघलांशी जसा लढा दिला तसाच संघर्ष आसामने केला आहे. आसामचे योद्धे लचित बरफुकन यांचे चरित्र जगासमोर यायला हवे. त्यासाठी जाणता राजा या नाटकाचे प्रयोग पाहण्याची सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली होती. त्यानुसार आसाममध्ये जाणता राजा नाटकाचे प्रयोग आयोजित करण्याचा आमचा मानस असल्याचे शर्मा यांनी सांगितले.
यासोबतच कामाख्या देवीचे भव्य मंदिर मुंबईत उभारले जाणार आहे. त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी योग्य जागा देण्याचे मान्य केले आहे. आम्ही त्यासाठी अर्जही केला आहे.लवकरच मुंबई दौरा करणार असून त्यात पुढील निर्णय होतील. कामाख्या मंदिर, आसामच्या संस्कृतीचा अविभाज्य भाग असणारे 'नवघर' हे मंदिर उभारण्यात येणार आहे. तसेच, आसाममध्ये महाराष्ट्र भवन उभारण्याची प्रक्रिया सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.
हेही वाचा