Latest

Jaipur-Mumbai Express Firing | मानसिक संतुलन बिघडल्याने होत्याचे नव्हते झाले!

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन : मुंबई-जयपूर एक्स्प्रेसमध्‍ये आज पहाटे पालघर जवळ आरपीएफ कॉन्स्टेबलने रेल्वे स्थानकाजवळ येताच चार जणांची गोळ्या झाडून हत्या केल्‍याची खळबळजनक घटना घडली. या घटनेत एका पोलिसासह तीन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे. या प्रकरणातील आरोपी चेतन सिंग याला पोलिसांनी अत्यंत धाडसाने पकडलं असून, त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू (Jaipur-Mumbai Express Firing) आहे, अशी माहिती जीआरपी आयुक्त डॉ. रवींद्र सिंघल यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे.

जीआरपी आयुक्त यांनी परिषदेत दिलेल्या माहितीनुसार, ही घटना घडल्यानंतर डब्यातील प्रवासी घाबरले. घटनास्थळावरून रेल्वेतील प्रवाशांनी पळ काढला. यामुळे घरी गेलेल्या प्रवाशांशी रेल्वे पोलिसांकडून संपर्क साधला जात आहे. तपासाशिवाय कोणत्याही निष्कर्षापर्यंत येणे चुकीचे ठरेल. त्यामुळे याप्रकरणी सखोल तपास करून वेळोवेळे अपडेट माध्यमांना दिले जातील, असेही ते म्हणाले.

आरपीएफ कॉन्स्टेबलची प्रकृती ठीक नव्हती. त्यामुळं त्यानं स्वतःवरील नियंत्रण गमावलं आणि त्याच्या वाटेत जो कोणी येईल त्याच्यावर त्यानं गोळ्या झाडल्या. यामध्ये पहिल्यांदा त्यानं आपला वरिष्ठ सहाय्यक पोलीस निरिक्षक टिकाराम यांच्यावर गोळी झाडली. त्यानंतर प्रवाशांवर गोळ्या झाडल्या. प्रवाशांसोबत त्याचा कुठलाही वाद झालेला नव्हता(Jaipur-Mumbai Express Firing ), असे देखील रेल्वे पोलीस आयुक्तांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले आहे.

चेतन हा 2009 साली अनुकंपा तत्वावर आरपीएफ मध्ये रुजू झाला होता. 13 वर्षं नोकरी तो सेवेत आहे. तो तापट स्वभावाचा आहे. तो आत्ताच सुट्टीवरून पुन्हा सेवेत रूजू झाला होता. दरम्यान त्याची बदलीही झाली होती, त्यामुळे त्याचे मानसिक संतुलन ठीक नव्हते. या घटनेनंतर रेल्वे पोलिसांकडून तपास सुरू करण्यात आला आहे. या घटनेसंदर्भातील व्हिडिओ, प्रत्यक्षात घटनास्थळी असलेल्या संपर्क करून या घटनेसंदर्भातील पुरावे गोळा केले जातील. त्यानंतर ते न्यायालयासमोर तपासासाठी ठेवले जातील असेही रेल्वे पोलिसांनी परिषदेत स्पष्ट केले आहे.

हेही वाचा:

SCROLL FOR NEXT