सासवड; पुढारी वृत्तसेवा : 'पुरंदर तालुक्यातच आंतरराष्ट्रीय विमानतळ करावा लागणार आहे,' असे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय मंत्री, खासदार शरद पवार यांनी सांगितले. छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीदिनी त्यांचे जन्मस्थळ किल्ले पुरंदरला भेट देऊन पाहणी केली, त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पासाठी दोन जागा लष्कराला सुचविल्या आहेत. त्यापैकी एका जागेला लष्कराने पसंती दर्शवली; मात्र त्यास त्या भागातील लोकांचा विरोध असल्याने आमदार संजय जगताप यांनी पर्यायी जागा सुचवली आहे. या जागेस लष्कराने नकार दर्शविला आहे, परंतु केवळ पुरंदर तालुकाच नाही तर पुणे जिल्ह्याला लागून असलेले कोल्हापूर, अहमदनगर, सांगली, सातारा, नाशिक, संगमनेर, खेड, चाकण या भागातील औद्योगिक पट्ट्यातील लोकांसाठी विमानतळ सोयीस्कर ठरणार आहे. त्यामुळे दोन्ही जागेबाबत सकारात्मक तोडगा काढून प्रकल्प मार्गी लावून तो पूर्ण करण्यात येईल, असेही पवार यांनी स्पष्ट केले.
सर्वोच्च न्यायालयाने देशद्रोहाचे कलम रद्द केल्याच्या प्रश्नाबाबत विचारले असता शरद पवार यांनी सत्ताधार्यांकडून याचा गैरवापर होत असल्याने उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांसमोर मीच कलम रद्द करण्याची सर्वांत पहिली मागणी केली, तसेच उत्तर प्रदेशच्या भाजपा खासदाराचा हिंदूंना विरोध नाही तर केवळ एका व्यक्तीला विरोध असल्याचे राज ठाकरे यांचे नाव न घेता सांगितले.
मोदी सरकारला आठ वर्षे पूर्ण झाली असून, देशात आर्थिक संकटे वाढली आहेत. याबाबत पवार म्हणाले, मोदी सरकारने नोटाबंदी, जीएसटीसारख्या निर्णय प्रक्रियेत लोकांना विश्वासात घेतले नाही. कोरोनात लोकांना थाळ्या वाजवायला लावल्या. त्यामागे केवळ थाळ्याच वाजवायला लावायच्या हाच उद्देश होता, असा खोचक टोला लगावला आहे.