मुंबई ; पुढारी ऑनलाईन : छत्रपती शिवाजी महाराज संपूर्ण देशाचे दैवत आहेत. त्यांचा अवमान तर दूर, कणभर अनादरही खपवून घेणार नाही. बंगळूरमधील समाजकंटकावर कडक कारवाईसाठी पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी कर्नाटक सरकारला कडक कारवाईचे आदेश द्यावेत, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांनी म्हटलं आहे.
बंगळूरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याबाबत अघटीत घडले आहे, तर त्याची कसून चौकशी करायलाच हवी. या प्रकाराकडे डोळेझाक करू नका, असे सांगून मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, गेले कित्येक वर्ष कर्नाटकमधील मराठी बांधवांवर अत्याचार केला जात आहे. आता तर शिवरायांसारख्या आपल्याआराध्य दैवताची विटंबना करण्याची घटना घडते. तेथील सरकार याकडे डोळेझाक करते, हे दुर्दैवी असल्याचे त्यांनी सांगितले.
नुकतेच वाराणसीत काशी विश्वेश्वराच्या मंदिरात पंतप्रधानांनी आपल्या भाषणात, देशाची संस्कृती चिरडण्याचा जेव्हा जेव्हा प्रयत्न झाला तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांसारखे पराक्रमी राजे निर्माण झाले असे कौतुकोद्गार काढले होते. या कार्यक्रमास काही दिवस झाले नाही तोच, भाजपशासित कर्नाटकात याच शिवरायांच्या पुतळ्याची विटंबना होते. या प्रकरणी कुणावर कारवाई न करता उलट मराठी माणसाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होतो आहे. हे अतिशय निंदनीय आणि अवमानकारक असल्याचे मुख्यमंत्री ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केली.
राज्यात कुणाचेही सरकार असो पण दैवते बदलत नाही. बेळगावात मराठी भाषिकांच्या गळचेपी करायची. सनदशीर मार्गाने सीमाप्रश्नी लढा देत असलेल्या मराठी भाषिकांवर कन्नड कर्मठांकडून हल्ला करायचे, असे भ्याड प्रकार थांबविण्याऐवजी त्याला खतपाणी घालायचे हे चालणार नाही.छत्रपतींचे नाव केवळ राजकारणासाठी घ्यायचे आणि आमच्या दैवताचा अनादर झाल्यावर मात्र बोटचेपी भूमिका घ्यायची. हे कदापिही खपवून घेतले जाणार नाही, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
हेही वाचलं का?