कोपरगाव : पुढारी वृत्तसेवा : तालुक्यात अनेक भागात सोयाबीन पिकांवर पिवळ्या मोझॅकचा (केवडा) प्रादुर्भाव दिसत आहे. या घटनेत शेतकरी मात्र हतबल झाला आहे. शेतकर्यांनी सोयाबीन पीक चांगले आणुनसुद्धा या रोगांमुळे उत्पादनात घट होणार असल्याने शेतकर्यांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. दरम्यान, कृषी विभागाने याबाबत शेतकर्यांना रोगाची ओळख व व्यवस्थापन कसे करावे, याबाबत मार्गदर्शन करण्याची गरज आहे.
या रोगाबाबत तातडीने जनजागृती मोहीम राबवावी, अशी मागणी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष आकाश नागरे यांनी कृषी विभागाकडे पत्राद्वारे केली आहे. तालुक्यात कोपरगाव, सुरेगाव, दहेगाव, रवंदे, पोहेगाव असे एकूण 5 महसूल मंडळ आहेत. या मंडळात 25,495 हेक्टर सोयाबीनचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जात आहे. पडलेल्या पावसामुळे शेतकर्यांमध्ये समाधानचे वातावरण असताना दुसरीकडे सोयाबीन पिकावर मोझॅक (केवडा) या रोगाचा प्रादुर्भाव दिसत आहे. यंदा चांगला पाऊस पडेल, या आशेवर शेतकरी उत्साहात होता, मात्र पावसाने धोका दिला. मृग नक्षत्रासह सुरुवातीस नक्षत्रे कोरडी गेल्याने शेतकर्यांचे पिक मागे पुढे झाले. आद्रातून आलेल्या पावसाने पीक निघाले. पिकांची वाढ झाली आता पिकाला फुलोर व शेंगा पकडण्याचा कालावधी सुरू आहे, मात्र याच कालावधीत पीक पिवळे पडून भाजल्यासारखे दिसत आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात बी- बियाणे, रासायनिक खते, मशागत मजुरीवर लाखो रुपये खर्च होत आहे. शेतकरी आर्थिक अडचणीत सापडून कर्ज बाजारी होत आहे.
हेही वाचा :