पुढारी ऑनलाईन डेस्क : INDvsAUS Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथा कसोटी सामना 9 मार्चपासून अहमदाबादच्या मैदानावर खेळवला जाणार आहे. इंदूर येथे तिसऱ्या कसोटीत भारताला 9 गडी राखून पराभव स्वीकारावा लागला असला तरी टीम इंडिया मालिकेत 2-1 ने आघाडीवर आहे. टीम इंडिया चौथी कसोटी जिंकून जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी सलग दुस-यांदा पात्र ठरेल. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारतीय संघातील दोन खेळाडूंचे रेकॉर्ड जबरदस्त आहे. या खेळाडूंच्या रेकॉर्डची धास्ती पाहुण्या ऑस्ट्रेलिया संघाने घेतली आहे, अशी चर्चा रंगली आहे.
अक्षर पटेलने आतापर्यंत ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतील तीन सामन्यांमध्ये चांगली कामगिरी केली आहे. त्याने या मालिकेत दोन अर्धशतकांसह एकूण 186 धावा फटकावल्या आहेत. तो उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. त्याने अहमदाबादच्या मैदानावर एकूण दोन सामने खेळले असून त्यात त्याने 20 विकेट्स घेतल्या आहेत. 2021 मध्ये त्याने एकट्याने भारताला इंग्लंडविरुद्धचा सामना जिंकून दिला होता. त्यामुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या कसोटीत कर्णधार रोहित शर्माला त्याच्याकडून धमाकेदार कामगिरीची अपेक्षा असेल. (INDvsAUS Test)
आर. अश्विनची गणना जगातील सर्वोत्तम खेळाडूंमध्ये केली जाते. भारताकडून कसोटीत सर्वाधिक विकेट घेणारा तो दुसरा गोलंदाज आहे. त्याने अहमदाबादच्या स्टेडियमवर तीन सामने खेळले असून त्यात त्याने 19 विकेट्स घेतल्या आहेत. फलंदाजीच्या कोणत्याही आक्रमणाला मुरड घालण्याची क्षमता त्याच्यात आहे. त्याने आतापर्यंत भारताकडून कसोटी सामन्यात 467 विकेट घेतल्या आहेत. (INDvsAUS Test)
तिसऱ्या कसोटीत टीम इंडियाला 9 विकेट्सनी पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमध्ये पोहोचण्याच्या त्याच्या आशांना मोठा धक्का बसला. डब्ल्यूटीसीच्या अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी टीम इंडियाला कोणत्याही किंमतीत अहमदाबाद कसोटीत विजयाची नोंद करावी लागेल. जर टीम इंडिया तिसरी कसोटी हरली तर त्यांना न्यूझीलंड आणि श्रीलंका यांच्यातील मालिकेच्या निकालाची वाट पाहावी लागणार आहे.