नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन; भारतीय शास्त्रज्ञ, अभियंते आणि शिक्षणतज्ज्ञांनी ६जी तंत्रज्ञानासाठी (6G technolog)y १०० पेटंट मिळवले आहेत, अशी माहिती आयटी आणि दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांनी गुरुवारी दिली. पीएचडी चेंबर ऑफ कॉमर्सने आयोजित केलेल्या भारत स्टार्टअप समिटमध्ये बोलताना मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, भारत जगातील सर्वात वेगवान नेटवर्क्ससह ५G तंत्रज्ञानामध्ये मोठी झेप घेत आहे.
इलेक्ट्रॉनिक्स खूप क्लिष्ट आहे. यात गुंतागुंत असूनही आमचे शास्त्रज्ञ, अभियंते आणि शिक्षणतज्ज्ञांनी मिळून ६G चे १०० पेटंट मिळवले आहेत," असे वैष्णव म्हणाले. ५G नेटवर्क ३१ मार्च २०२३ पर्यंत सरकारचे २०० शहरांचे लक्ष्य ओलांडेल. सध्या ३९७ शहरांमध्ये ५G कव्हरेज आहे. भारताची अर्थव्यवस्था ३.५ ट्रिलियन डॉलर्स झाली आहे. प्रशासन, पायाभूत सुविधा आणि व्यवसायांमधील परिवर्तनासह भारत जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनू शकतो, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.
"जेव्हा एखाद्या देशाला अथवा अर्थव्यवस्थेला ही उच्च पातळी गाठायची असते, तेव्हा हजारो व्यवस्था बदलाव्या लागतात. प्रशासन व्यवस्था, लॉजिस्टिक्स सिस्टीम, बँकिंग सिस्टीम आणि स्वतःच्या व्यवसाय पद्धतीत बदल करावा लागतो. आता प्रत्येकाने या परिवर्तनाच्या प्रवासातून जाण्याची हीच वेळ आहे. जर आपण हे परिवर्तन करू शकलो तर भारताला USD ३० ट्रिलियन अर्थव्यवस्था होण्यापासून कोणतीही शक्ती रोखू शकणार नाही," असे वैष्णव यांनी सांगितले.
१० वर्षांपूर्वी ९९ टक्के मोबाईल फोन आयात केले जात होते आणि आता भारतात वापर होणाऱ्या ९९ टक्के युनिट्सची निर्मिती स्थानिक पातळीवर होते, असेही ते म्हणाले. "गेल्या ७-८ महिन्यांत भारतातून रेडिओ उपकरणांची निर्यात सुरू झाली आहे आणि तीही अमेरिकेत होत आहे," असे वैष्णव यांनी सांगितले.
देशात याआधी मोबाईल फोनच्या निर्मितीबाबत हलगर्जीपणा दाखवल्याचा आरोप करत त्यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली.
हे ही वाचा :