नवी दिल्ली: पुढारी ऑनलाईन: चंद्रयान ३ च्या यशानंतर भारत गगनयान मोहिमेत महिला रोबोट 'व्योममित्र' पाठवणार आहे. ऑक्टोबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात अंतराळात उड्डाण करण्याची चाचणी घेण्याचा प्रयत्न केला जाईल. त्यानंतर या मोहिमेत महिला रोबोट 'व्योममित्र' अंतराळात पाठवला जाईल, असे केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री जितेंद्र सिंग यांनी आज (दि.२६) जी 20 परिषदेत सांगितले. (Chandrayaan-3)
कोविड-19 महामारीमुळे गगनयान प्रकल्पाला विलंब झाला. आता आम्ही ऑक्टोबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात पहिली चाचणी मोहीम राबवण्याचा विचार करीत आहोत. अंतराळवीरांना परत सुखरूप आणणे हे अंतराळात पाठवण्याइतकेच महत्त्वाचे आहे, असेही सिंग यांनी सांगितले. त्याचबरोबर दुसऱ्या मोहिमेत एक महिला रोबोट असेल. आणि ती सर्व मानवी क्रियांचे अनुकरण करेल. यामध्ये सर्व काही नीट झाले, तर आम्ही पुढे जाऊ शकतो, असेही त्यांनी सांगितले. (Chandrayaan-3)
चंद्रयान-3 अखेर चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ उतरल्याने इस्त्रोच्या संशोधकांना मोठे यश मिळाले आहे. चंद्रयान-3 चंद्रावर उतरण्याआधी आम्ही खूप घाबरलो होतो. जेव्हा चंद्रयान-3 यान पृथ्वीच्या कक्षेतून चंद्राच्या कक्षेत गेले, तेव्हा मोठा आनंद झाला. चंद्रावर चंद्रयान उतरणे हे इस्त्रोच्या आणि देशाच्या अंतराळ प्रवासातील एक मोठा क्षण आहे.
2019 पर्यंत श्रीहरिकोटाचे दरवाजे माध्यमे आणि शालेय विद्यार्थ्यांसाठी बंद होते, परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खुले करून माध्यमे आणि शालेय मुलांना आमंत्रित केले, असेही मंत्री सिंग म्हणाले. पंतप्रधानांनी अंतराळ कार्यक्रमासाठी निधीमध्ये मोठी वाढ केल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
हेही वाचा