नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन
देशात कोरोनाच्या (COVID19) वाढत्या रुग्णसंख्येमुळे चिंता व्यक्त केली जात आहे. गेल्या २४ तासांत कोरोनाचे ७,२४० नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर ८ जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे देशातील सक्रिय रुग्णसंख्या ३२,४९८ वर पोहोचली आहे. दिवसभरात ३,५९१ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. दैनंदिन रुग्णसंख्येत ४० टक्क्यांनी वाढ झाली असल्याचे दिसून आले आहे. महाराष्ट्रातील रुग्णसंख्येतही ४२ टक्क्यांनी वाढ झाली. सर्वाधिक रुग्ण मुंबईत आढळून येत आहेत.
देशात गेल्या तीन महिन्यांनी दैनंदिन कोरोनाबाधितांच्या (COVID19) संख्येने ५ हजारांचा टप्पा ओलांडला आहे. बुधवारी दिवसभरात ५ हजार २३३ कोरोनाबाधितांची भर पडली होती. विशेष म्हणजे गेल्या एका दिवसात दैनंदिन कोरोनाग्रस्तांच्या संख्येत तब्बल ४० टक्क्यांनी वाढ नोंदवण्यात आली आहे. मंगळवारी दिवसभरात ३ हजार ७१४ कोरोनाबाधित आढळले होते. गेल्या एका दिवसात ३ हजार ३४५ रुग्णांनी कोरोनावर मात मिळवली, तर ७ रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला होता.
देशात आतापर्यंत १९४ कोटी ५९ लाख ८१ हजार ६९१ कोरोना डोस देण्यात आले आहेत. यातील ३.४६ कोटी डोस १२ ते १४ वयोगटातील बालकांना देण्यात आले आहेत. तर, खबरदारी म्हणून ३.७२ कोटी बूस्टर डोस देण्यात आले आहेत. केंद्र सरकारकडून पुरवण्यात आलेल्या १९३ कोटी ५३ लाख ५८ हजार ८६५ डोस पैकी १४ कोटी ४८ लाख ५६ हजार ७८० डोस अद्यापही राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांकडे शिल्लक आहेत. देशात आतापर्यंत ८५.३५ कोटी कोरोना तपासण्या करण्यात आल्या आहेत.३ लाख १३ हजार ३६१ तपासण्या बुधवारी दिवसभरात करण्यात आल्याची माहिती आयसीएमआरकडून देण्यात आली आहे.