पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय महिला क्रिकेट संघाने आशिया कपमध्ये सलग तिसरा विजय नोंदवला आहे. मंगळवारी (दि. 4) झालेल्या सामन्यात भारताने यूएईचा 104 धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना भारताने जेमिमा रॉड्रिग्ज आणि दीप्ती शर्मा यांच्या अर्धशतकांच्या जोरावर 5 गडी गमावून 178 धावा केल्या. यानंतर विजयी लक्ष्याचा पाठलाग करताना यूएई संघाने भारतीय गोलंदाजांसमोर नांगी टाकली. त्यांना केवळ 74 धावाच करता आल्या. (Womens Asia Cup)
तत्पूर्वी, भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. परंतु संघाने केवळ 19 धावांवर 3 खेळाडू गमावले. त्यामुळे नाणेफेक जिंकूनही पहिला फलंदाजी करण्याचा भारताचा निर्णय चुकीचा वाटला. मात्र दीप्ती शर्मा आणि जेमिमा रॉड्रिग्ज यांनी शानदार फलंदाजी करत संघाचा डाव सावरला. दोघांनी 129 धावांची भागिदारी करून संघाची धावसंख्या 148 पर्यंत नेली. नंतर पूजा वस्त्राकर आणि किरण नवग्रे यांनी फटकेबाजी करत संघाची धावसंख्या 178 पर्यंत पोहचवली. जेमिमाने सर्वाधिक 75 धावा केल्या आणि शेवटपर्यंत नाबाद राहिली. त्याचवेळी दीप्ती शर्मानेही 49 चेंडूत 65 धावांची शानदार खेळी केली. (Womens Asia Cup)
शानदार फलंदाजी केल्यानंतर भारतीय महिला संघाने क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजीमध्येही चुरस दाखवली. 179 धावांचा पाठलाग करणाऱ्या यूएई संघाची सुरुवात चांगली झाली नाही आणि 50 धावांतच त्यांच्या तीन विकेट पडल्या. त्यानंतर वेगवान धावा करण्याच्या नादात फलंदाज एकामागून एक पॅव्हेलियनकडे जात राहिले. क्षेत्ररक्षणाबद्दल बोलायचे झाले तर भारतीय महिलांनी या सामन्यात उत्कृष्ट क्षेत्ररक्षण केले आणि अशा अनेक धावा वाचवल्या, ज्यात चौकारही होऊ शकले असते. भारताच्या तगड्या गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणामुळे यूएई संघ 74 धावांवर बाद झाला आणि भारताने 104 धावांनी सामना जिंकला. (Womens Asia Cup)