Latest

IND vs SA : टीम इंडियाच्या अपीलमुळे अंपायरला हार्टॲटॅक! (Video)

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : दक्षिण आफ्रिका आणि भारत (IND vs SA) यांच्यात जोहान्सबर्ग येथील वांडरर्स मैदानावर दुसरा कसोटी सामना खेळल्या जात आहे. तीन सामन्यांची कसोटी मालिकेत भारत १-० ने आघाडीवर आहे. सध्या दुसऱ्या कसोटी सामन्यात यजमान द. आफ्रिकेला विजयासाठी २४० धावांचे लक्ष्य गाठायचे आहे. तिस-या दिवशी भारताचा दुसरा डाव २६६ धावांवर आटोपला. त्यानंतर लक्ष्याचा पाठलाग करताना दिवसाअखेरच्या खेळापर्यंत द. आफ्रिकेने २ बाद ११८ धावा केल्या आणि विजय सोपा केला. सामन्याचे दोन दिवस बाकी आहेत. पण आज (दि. ६) सामन्याच्या चौथ्या दिवशी पावसामुळे नियोजित वेळेत सामना सुरू झाला नाही. वेदर रिपोर्टनुसार सामना सुरू होण्यास उशीर होईल.

दरम्यान, काल (दि. ५) सामन्याच्या तिसऱ्या दिवशी एक मजेदार घटना घडली. या सामन्यात मैदानावरील पंचाची भूमिका बजावत असलेले मरायस इरास्मस (marais erasmus) हे चक्क भारतीय खेळाडूंना घाबरल्याचे समोर आले आहे. टीम इंडियाचे खेळाडूंच्या सततच्या अपीलमुळे हैराण झाले आणि त्यांनी चक्क 'तुम्ही लोक मला प्रत्येक षटकात हृदयविकाराचा झटका देत आहात' असं मिश्कीलपणे म्हणाले. त्यांचे हे संभाषण रेकॉर्ड झाले असून या मजेशीर घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. (IND vs SA)

खरेतर, दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजीच्या १० व्या षटकात, वेगवान गोलंदाज शार्दूर ठाकूरने एडन मार्करामविरुद्ध तीनदा एलबीडब्ल्यूचे अपील केले. पण हे अपील फेटाळण्यात आले. पण, तिसऱ्यावेळी शार्दुलने मार्करामची विकेट घेतली. यादरम्यान अंपायर इरास्मस खूप दडपणाखाली असल्याचे दिसून आले. त्यानंतर लगेचच शार्दुलने अचूक मारा करत प्रतिस्पर्धी संघाचा कर्णधार डीन एल्गरलाही अडचणीत आणले. यावेळीही टीम इंडियाने ज्यादा अपील करून अंपायर इरास्मस (marais erasmus) यांच्यावर दबाव वाढवण्याचा सतत प्रयत्न केला. त्यामुळे ते अस्वस्थ झाले होते. अपील झाली की ते चिंतेत पडायचे. अखेर त्यांनी भारतीय खेळाडूंची फिरकी घेणे ठरवले आणि तुम्ही माझ्यावर दबाव टाकून हृदयविकारचा झटका देत असल्याचे म्हटले. (IND vs SA)

तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा दक्षिण आफ्रिकेने २ विकेट गमावून ११८ धावा केल्या. डीन एल्गर १२१ चेंडूत ४६ आणि रासी व्हॅन डर ड्युसेन ३७ चेंडूत ११ धावा करून क्रिजवर आहेत. हा सामना जिंकण्यासाठी दक्षिण आफ्रिकेला १२२ धावांची गरज आहे. तर भारताला ८ बळी घ्यावे लागणार आहेत. (IND vs SA)

SCROLL FOR NEXT