पुढारी ऑनलाईन : येत्या तीन ते चार दिवसात राज्यातील उत्तरेकडील काही भागात तापमानाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाने दर्शवली आहे. उत्तरेकडून महाराष्ट्राच्या काही भागात कोरडे आणि उष्ण वारे येणार असल्याने तापमान वाढणार असल्याची शक्यता आहे. राज्यातील काही भागात या उष्ण वाऱ्यामुळे दिवसा तापमान अधिक असणार असल्याचेही हवामान विभागाने म्हटले आहे.
राज्यात गेल्या तीन ते चार दिवसांपासून दिवसा कडक तडाका, रात्री आणि पहाटे थंडीचा कडाका असे विचित्र वातावरण आहे. दरम्यान शनिवारी राज्यात पुणे शहरात नीचांकी 9.9 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. महाराष्ट्र, गुजरात तसेच गोव्याच्या बहुतांश भागात पुढील तीन दिवस कमाल तापमान चढेच राहणार आहे.
विशेषत: राज्यात कमाल तापमनाचा पारा 39 अंशांच्या आसपास राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. राज्यात गेल्या आठ ते दहा दिवसांपासून वातावरणात चढ-उतार दिसून येत आहे. हिमालयीन भागासह उत्तर भारतात सातत्याने हवामानात बदल होत असल्यामुळे राज्यात देखील बदल होत असल्याचे दिसून आले आहे. पुणे शहर आणि आसापसच्या भागात शनिवारी किमान तापमानाचा पारा सरासरीपेक्षा खाली घसरला.
हे ही वाचा :