पुढारी ऑनलाईन डेस्क : . सर्वांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आपल्या घरातील व्यक्तीप्रमाणे वाटतात. मात्र, उद्धव ठाकरे यांची सर्जरी झाली तेव्हाच बंडाचे पाऊल उचलण्यात आले. काही लोक आयपीएल ऑक्शनमध्ये प्राइसटॅग लावल्याप्रमाणे असतात, असे लोक आपल्याला शिवसेनेत नको आहेत. बंड केलेले आमदार परतले तर त्यांना शिवसेनेत घेऊ, असे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले. शिवसैनिकांशी आदित्य ठाकरे यांनी आभासी पद्धतीने संवाद साधला यावेळी ते बोलत होते. (Maharashtra Political Crisis)
एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसैनिकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. आज दिवसभरात अनेक शिवसैनिकांनी उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ आंदोलन केले. यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांची आभासी पद्धतीने बैठक आयोजित केली होती. (Maharashtra Political Crisis)
देशभरातून उद्धव ठाकरे यांच्या कामाचे कौतुक होत आहे. इतर राज्यामध्ये मी जातो तेव्हा तेथील लोकही उद्धव ठाकरे यांच्या कामाचे कौतुक करतात असतात. कोरोना काळात मुख्यमंत्र्यांनी विकासकामे थांबवली नाहीत. या काळात देखील महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्यात आली. दोन महिन्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येतील, या निवडणुकांमध्ये शिवसेनेला मोठे यश मिळेल, असा विश्वास पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी शिवसैनिकांशी संवाद साधताना व्यक्त केला. (Maharashtra Political Crisis)