पुढारी ऑनलाईन डेस्क : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून (ICC) खेळाडूंची नवी क्रमवारी दर आठवड्याला जाहीर केली जाते. यात भारतीय फलंदाजांनी टी २० क्रमवारीत कमालीची प्रगती केली आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या नुकत्याच झालेल्या मालिकेत धमाकेदार फलंदाजी करणाऱ्या व्यंकटेश अय्यर (Venkatesh Iyer) आणि सूर्यकुमार यादव यांनी क्रमवारीत लक्षणीय झेप घेतली आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी २० मालिकेत दोन्ही फलंदाजांनी अश्वासक फटकेबाजी केली. अखेरच्या टी २० मध्ये दोघांमध्ये झालेल्या ९१ धावांच्या अतुलनीय भागीदारीने संघाच्या विजयाचा पाया रचला होता.
आयसीसीने बुधवारी (दि. २३) आपली ताजी क्रमवारी जाहीर केली. भारतीय अष्टपैलू व्यंकटेश अय्यरने (Venkatesh Iyer) टी २० फलंदाजी क्रमवारीत २०३ स्थानांची झेप घेतली आहे. तो ३१८ व्या क्रमांकावरून थेट ११५ व्या क्रमांकावर पोहोचला आहे. तर सूर्यकुमार यादवने ३५ स्थानांनी सुधारणा करत २१ वे स्थान मिळवले आहे.
वेस्ट इंडिजविरुद्ध खेळल्या गेलेल्या टी २० मालिकेत धावांच्या करण्याच्या बाबतीत सूर्यकुमार पहिल्या तर व्यंकटेश (Venkatesh Iyer) दुसऱ्या क्रमांकावर राहिला. पहिल्या सामन्यात भारताने चार विकेट्स लवकर गमावल्या होत्या. संघाला ४५ चेंडूत ६५ धावांची गरज होती, त्यावेळी यादव आणि अय्यरने भारताला विजय मिळवून दिला. याचबरोबर टीम इंडियाने मालिकेत आघाडी मिळवली. दुसरीकडे, तिसऱ्या सामन्यात भारताने ९४ धावांत ४ विकेट गमावल्या. यादवने व्यंकटेशसोबत शानदार भागीदारी करत ३७ चेंडूत ९१ धावा जोडून संघाची धावसंख्या १८४ पोहोचवली.
दरम्यान, केएल राहुलची दोन स्थानांनी घसरण झाली असून तो सहाव्या स्थानावर आहे. तर विराट कोहलीने फलंदाजांच्या यादीत दहावे स्थान कायम राखले आहे. कोहली पहिल्या १० मध्ये असला तरी विराटसाठी हा मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे. पाकिस्तानचा बाबर आझम पहिल्या क्रमांकावर कायम आहे. तसेच रोहित शर्मा टी २० क्रमवारीतील टॉप १० मधून बाहेर गेला आहे.