खुशी निरामिष (Kkhushi Niramish) पुढारी ऑनलाइन डेस्क : राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) या आठवड्यात जम्मू-काश्मीरच्या तीन जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात छापेमारी केली. सूत्रांच्या माहितीनुसार, हायब्रिड दहशतवाद्यांचा (Hybrid Terrorist) शोध घेणे, त्यांच्याजवळील डेटा आणि माहिती जप्त करणे हा या छापेमारीतील प्रमुख उद्देश होता. एनआयए असो किंवा सुरक्षा दल किंवा जम्मू काश्मीर पोलिस यांच्या अलिकडील काळातील प्रत्येक कारवाईत 'हायब्रिड दहशतवाद्यांचा आणि ओव्हरग्राऊंड वर्करचा' उल्लेख वारंवार येत आहे. त्यामुळे अनेकांना हा हायब्रिड दहशतवादी नेमके कोण आहेत. ही कोणती नवीन अतिरेकी संघटना आहे का? ते कसे काम करतात. पोलिस किंवा सुरक्षा दलांना यांचे मोठे आव्हान का वाटते? हे हायब्रिड दहशतवादी फक्त जम्मू काश्मीरमध्येच आहेत का? भारताला याचा किती धोका आहे? या सगळ्या प्रश्नांचा आढावा येथे घेतला आहे.
हायब्रिड दहशतवाद हा शब्द किंवा ही संज्ञा जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी सर्वप्रथम वापरली. सामान्यपणे 2021 नंतर या हायब्रिड दहशवाद/दहशतवादी यांच्याबाबत जम्मू काश्मीर पोलिसांनी उल्लेख केला. पोलिसांनी या संज्ञेची अशी व्याख्या केली आहे की, पारंपारिक पद्धतीने प्रत्यक्ष दहशतवादी नसतात. पोलिसांजवळील अतिरेक्यांच्या यादीत ते सूचीबद्ध नसतात. सामान्य जीवनात राहून जे कट्टरवाद जोपासतात आणि दहशतवादी गटासाठी कार्य करणे, दहशतवादी गटाने किंवा त्यांच्या गटाने दिलेले एखादे विशिष्ट देशविरोधी लक्ष्य पूर्ण करणे आणि पुन्हा आपल्या दैनंदिन जीवनात रूळणे त्यांना हायब्रिड दहशतवादी असे म्हटले जाते.
ओव्हर ग्राऊंड वर्करचे कार्य देखील थोडेफार अशाच प्रकारचे असते. मात्र, ओव्हर ग्राउंड वर्कर बहुतेक वेळा प्रत्यक्ष हिंसक कारवायांमध्ये सहभागी होत नाही. ते संदेश, शस्त्र, पैसे पोहोचवणे इत्यादींसारखी कामे करतात.
मोठ्या दहशतवादी संघटना आपले सौम्य किंवा लहान लक्ष्य गाठण्यासाठी सर्व सामान्य स्थानिक लोकांमधून 'हायब्रिड दहशतवादी' तयार करतात. सोशल मीडिया तसेच अन्य मार्गांनी त्यांचे ब्रेन वॉश करण्यात येते. यामध्ये तरुणांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. मात्र, त्यांचा दहशतवादी संघटनांशी थेट संबंध येत नाही किंवा दहशतवाद्यांप्रमाणे ते थेट मोठ्या कारवाया करत नाही. मात्र ते कट्टरवादी असतात. त्यांच्याकडे मोठा शस्त्रसाठा नसतो. ते कधीही भूमीगत पद्धतीने कार्य करत नाही. दहशतवादी संघटना त्यांना एखाद्या हँडलरच्या माध्यमातून लहान-लहान देशविरोधी कृत्याचे लक्ष्य देते. तसेच ते पोलिस किंवा सुरक्षा दलाच्या वॉन्टेडच्या यादीत नसतात ही 'हायब्रिड दहशतवाद्या'ची सर्वात मोठी बाजू किंवा ओळख म्हणता येईल आणि हेच खूप मोठे आव्हान देखील आहे.
हायब्रीड दहशतवादी सर्वसामान्य लोकांप्रमाणे सर्वसामान्य लोकांमध्ये मिसळून राहतात. तसेच त्यांना दिलेले लक्ष्य पूर्ण झाल्यानंतर ते पुन्हा त्यांच्या दैनंदिन जीवनातील कार्यात रूळतात. हायब्रिड दहशतवाद्यांना सामान्यपणे त्यांच्या आसपासच्या परिसरातील अशा लोकांना लक्ष्य करण्यास सांगितले जाते जे शांतीचा प्रयत्न करत आहेत किंवा दहशतवादाच्या विरोधात बोलतात किंवा मत प्रदर्शित करतात. तसेच हे लक्ष्य सामान्यपणे असे असते जे पुन्हा प्रतिकार करू शकत नाही. उदाहरणार्थ व्यापारी, निवृत्त पोलिस, सामाजिक कार्यकर्ते आदींना हायब्रीड दहशतवादी पाळत ठेवून लक्ष्य करतात.
फर्स्ट पोस्टने न्यूज18 च्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, सुरक्षा एजन्सी या दहशतवाद्यांचे वर्णन "सर्वसामान्य माणसे" असे करतात ज्यांना दहशतवादी गटांनी स्टँडबाय मोडवर ठेवले आहे.
काश्मीरमध्ये गेल्या 20 महिन्यांत झालेल्या 55 नागरिकांच्या हत्येपैकी 70 टक्क्यांहून अधिक हत्यांसाठी पोलीस या 'हायब्रीड अतिरेक्यांना' जबाबदार मानतात. यामध्ये पाचपैकी एक जण तरुण होता.
हायब्रिड दहशतवादी हे त्यांच्या असाइनमेंट दरम्यान त्यांचे सामान्य जीवन जगतात. सुरक्षा एजन्सींना त्यांचा मागोवा घेणे आणि त्यांचा शोध घेणे कठीण जाते कारण ते सामान्य लोकांमध्ये राहतात. फर्स्ट पोस्टच्या माहितीनुसार जम्मू आणि काश्मीरचे पोलीस महासंचालक (डीजीपी) दिलबाग सिंग यांनी याविषयी माहिती देताना सांगितले की, " इथे असे हायब्रिड दहशतवादी आहेत ज्यांच्याकडे दहशतवादाशी संबंधित घटनांची फारशी नोंद नाही. ते त्यांच्या पहिल्या क्रियाकलापानंतरच दहशतवादी बनतात. या लोकांना दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असेही ते म्हणाले.
त्यांचे दिग्दर्शन कोण करत आहे?
अधिकार्यांनी पीटीआयला सांगितले की, पाकिस्तान आणि त्याची गुप्तचर संस्था, आयएसआयच्या निर्देशानुसार खोऱ्यात हा ट्रेंड होत आहे.
श्रीनगरमध्ये एका लोकप्रिय भोजनालयाच्या मालकाच्या मुलाची अतिरेक्यांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. 17 फेब्रुवारी 2021 रोजी कृष्णा ढाबा अतिरेकी हल्ला म्हणून ओळखला जातो. यानंतरच या अहवालानुसार सुरक्षा दलांनी हा शब्दप्रयोग केला. पोलिस उपनिरीक्षक संचित शर्मा यांनी हे प्रकरण सोडवले होते.
त्यानंतर 7 ऑक्टोबर 2021 रोजी द रेझिस्टन्स फ्रंट (TRF) शी संबंधित संशयित अतिरेक्यांनी श्रीनगरमधील सरकारी शाळेत दोन गैर-मुस्लिम शिक्षकांची हत्या केली. या हत्येच्या तपासादरम्यान "हायब्रीड दहशतवादी" तेव्हा हा शब्द पहिल्यांदा उदयास आला.
पोलीस उप अधीक्षक (DSP) संचित शर्मा यांना तपासातील उत्कृष्टतेसाठी गृहमंत्र्यांचे पदक बहाल केले. त्यानंतर या शब्दाचा व्यापक वापर झाला. केंद्राने 150 हून अधिक देशव्यापी अधिकाऱ्यांना पदक बहाले केले. त्यामध्ये संचित शर्मा हे जम्मू आणि काश्मीरमधील एकमेव अधिकारी होते.
अधिकाऱ्यांनी सांगितले की दहशत पसरवणे आणि दहशतवादी आणि त्यांच्या इकोसिस्टमला लक्ष्य करणारे व्यवसाय आणि सामाजिक क्रियाकलाप थांबवणे हा यामागचा उद्देश आहे.
ते फुटीरतावादाच्या विरोधात आणि हिंसाचार करणार्या आणि भडकावणार्यांविरुद्ध बोलणार्या आवाजांना लक्ष्य करतात आणि त्यांना संपवून टाकतात. हेच त्यांचे उद्दिष्ट आहे, असे अधिकार्यांनी सांगितले. सुरक्षा एजन्सी मानतात की हा प्रकार यादृच्छिक (रँडम) नसून योग्यरित्या नियोजित आहे.
"हे कधीही यादृच्छिक नसते. यात हालचालींचे नमुने पाहणे आणि नित्यक्रमाचा कमकुवत भाग शोधणे समाविष्ट आहे. स्पॉटर एक OGW किंवा अगदी हायब्रिड दहशतवादी असू शकतो जो पोलिसांच्या यादीत नाही. परंतु लक्ष्य गाठण्याकडे त्यांच्यासाठी भाडोत्री शूटरप्रमाणेच त्यांच्याकडे पिस्तूल आणि मारण्याचा हेतू देखील असतो," असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
ही एक अशी परिसंस्था आहे जिथे फक्त संख्याच महत्त्वाची असते. किती जणांना मारले हे महत्वाचे असते. त्यामुळे पीडित व्यक्तीला किंवा सोयीस्कर सॉफ्ट टार्गेटला मारण्यासाठी कोणतेही विशेष कारण नसते. मारेकऱ्यासाठी, तो (लक्ष्य) कोण आहे, काही फरक पडत नाही, असेही ते म्हणाले.
या दहशतवाद्यांकडून वापरल्या जाणाऱ्या शस्त्रास्त्रांमध्येही बदल झाल्याचे गुप्तचर यंत्रणांच्या लक्षात आले आहे. नागरिकांना लक्ष्य करणाऱ्या हायब्रिड दहशतवाद्यांनी चिकट बॉम्बचा वापर आणि छोटी शस्त्रे बाळगण्यास सुरुवात केल्याचे सूत्रांनी सांगितले.
" एके – 47 घेऊन फिरण्याऐवजी, एक लहान पिस्तूल खिशात ठेवणे चांगले आहे कारण ते वाहून नेणे सोपे असते," असे एका गुप्तचर सूत्राने सांगितले. पिस्तूलचा दर्जा देखील चायनीज फायबरपासून अधिक अत्याधुनिक मेकमध्ये सुधारला आहे.
2021 मध्ये, अधिकाऱ्यांनी पीटीआयला सांगितले की ते श्रीनगर शहरासह खोऱ्यातील सॉफ्ट टार्गेट्सवर, सुरक्षा एजन्सीकडे दहशतवादी म्हणून सूचीबद्ध नसलेल्या पिस्तूलधारी तरुणांद्वारे हल्ले करू पाहत आहेत.
या हायब्रिड दहशतवाद्यांचे विशिष्ट दहशतवादी गटांशी संबंध सिद्ध करणे ही सर्वात कठीण गोष्ट आहे. परिणामी अशा दहशतवाद्यांना पोलिसांकडून लक्ष्य केले गेले तर परिसरातील आणखी स्थानिक लोक बंदुका हाती घेतात आणि दहशतवादी संघटनांसाठी कार्य करून आणखी नवीन हत्या करतात. त्यामुळे हायब्रिड दहशतवाद्यांचा दहशतवादी संघटनांशी संबंध सिद्ध करणे आणि अन्य स्थानिकांमध्ये कट्टरतावाद बळावू न देता आणखी नवीन हायब्रिड दहशतवादी बनणार नाही, हे पोलिसांसमोरचे सर्वात मोठे आव्हान आहे, अशी माहिती सूत्रांनी दिल्याचे फर्स्ट पोस्टने म्हटले आहे.
मानवाधिकार कार्यकर्त्यांनी पोलिसांनी दिलेल्या या नवीन संज्ञेवर टीका केली आहे. त्यांचा असा दावा आहे की कलम 14 नुसार सुरक्षा एजन्सीद्वारे त्याचा गैरवापर केला जात आहे. त्यांचा असा युक्तिवाद आहे की ज्या प्रदेशात पोलिसांचा अतिरेक आहे आणि सैन्याला विशेष अधिकार आहेत, अशा प्रदेशात ते कोणालाही ओव्हर ग्राउंड वर्कर किंवा हायब्रिड दहशतवादी म्हणून ठरवू शकतात.
या आक्षेपावर एडीजीपी कुमार यांनी " खोऱ्यातील बहुतेक हत्या 'संकरित अतिरेक्यांनी' पिस्तुलाने केल्या आहेत. "हे संकरित अतिरेकी गेल्या दीड वर्षांपासून आम्हाला त्रास देत आहेत. परंतु यातील 80 टक्के अतिरेकी आता आमच्या रडारवर आहेत"
कुमार म्हणाले की सुरक्षा दलांनी खोऱ्यातील सर्व 35 टक्के हायब्रिड दहशतवाद्यांना संपवले आहे. ते पुढे म्हणाले की, काश्मीरमध्ये या नव्या जमान्यातील अतिरेक्याचे जीवन खूपच कमी झाले आहे. ते पुढे म्हणाले की तांत्रिक पाळत ठेवणे, सोशल मीडिया आणि मानवी संसाधनांद्वारे तीन ते नऊ महिन्यांत बहुतेक हायब्रिड अतिरेक्यांना संपवले जात आहे. अतिरेकी हायब्रिड असो की पारंपारिक ते सर्व आता सुरक्षा दलांसोबतच्या चकमकींमध्ये सारखीच शिक्षा भोगत आहेत.
फर्स्ट पोस्टने आपल्या वृत्तात म्हटले आहे की, जम्मू आणि काश्मीर पोलिसांच्या एका अधिकाऱ्याने इंडिया टुडेशी बोलताना सांगितले की, पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेवरून दररोज पिस्तूलांची खेप पाठवत आहे. अनेक माल जप्त करण्यात आले असले तरी, अनेकांनी ते हायब्रिड दहशतवाद्यांच्या हाती दिले आहे, जे आता दहशत माजवत आहेत.
पोलिस पुढे म्हणाले, "मला ही अनिश्चिततेची भावना 1990 च्या दशकातही आठवत नाही. आता माझ्या कुटुंबासोबत बाहेर जाणे अशक्य आहे. मी माझी दिनचर्या बदलण्याचा प्रयत्न केला असला तरी आता कोणीही लक्ष्य बनू शकते. माझा एक घरगुती मदतनीस आहे जी स्थलांतरित आहे. मी माझ्या कुटुंबाला सांगितले आहे की घरात फक्त दोनच संभाव्य लक्ष्य आहेत – तो आणि मी आणि यापुढे आम्हा दोघांनाही अत्यंत सावधगिरी बाळगावी लागेल.
पोलिसांनी सप्टेंबर 2020 च्या पहिल्या आठवड्यात श्रीनगर शहर दहशतवादमूक्त म्हणून घोषित केले होते. तथापि, त्यानंतरही नागरिक आणि पोलिसांवर हल्ले झाले आहेत आणि या हल्ल्यांमध्ये 'हायब्रिड दहशतवाद्यांचे' हात असल्याचे अधिकाऱ्यांचे मत आहे.