हिंगोली, पुढारी वृत्तसेवा : शहरातील जलेश्वर तलावाच्या परिसरातील १९५ अतिक्रमणधारकांना तहसील प्रशासनाने बुधवारी (दि.२८) नोटीस बजावली असून पुढील ४८ तासात अतिक्रमण हटवावे, अन्यथा प्रशासनाकडूनच अतिक्रमण काढून त्याचा खर्च अतिक्रमण धारकांतून वसुल करण्याचा इशारा देण्यात आला आहे. (Hingoli News )
शहरातील जलेश्वर तलावाच्या सुशोभीकरणाला प्रशासनाने मान्यता दिली आहे. त्यानुसार या ठिकाणी विविध विकास कामे केली जाणार आहेत. मात्र तलावाच्या परिसरातील जागेवर १९५ अतिक्रमणधारकांनी अतिक्रमण करून कच्चे व पक्के घर बांधकाम केले आहे. त्यामुळे विकास कामांसाठी मोठा अडथळा निर्माण झाला होता. महसुल प्रशासन व पालिका प्रशासनाने संयुक्तपणे अतिक्रमण हटावो मोहिम सुरु करून काही अतिक्रमणे हटवली होती. त्यानंतर अतिक्रमणधारकांनी तहसील प्रशासनाकडे निवेदन देऊन जागेच्या मालकीहक्काचे पुरावे सादर करण्यासाठी वेळ मागितली होती. त्यानंतर तहसीलदार नवनाथ वागवड यांनी ९ फेब्रुवारी रोजी सुनावणी घेतली होती. या सुनावणीमध्ये अतिक्रंमणधारकांना मालकीहक्काचे पुरावे सादर करता आले नाही. त्यामुळे तहसील प्रशासनाने अतिक्रमणधारकांना नोटीस बजावली असून ४८ तासाच्या आत अतिक्रमण काढून घेण्याचे आदेश दिले आहेत.
या मुदतीत अतिक्रमण काढले नसल्यास प्रशासनाकडून अतिक्रमण हटावो मोहिम हाती घेतली जाईल. त्यानंतर अतिक्रमण काढण्याचा खर्च अतिक्रमणधारकांकडून वसुल करण्याचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे आता अतिक्रमणधारकांमधून मोठी खळबळ उडाली आहे.
हेही वाचा