लिंगनूर, इस्लामपूर: पुढारी वृत्तसेवा
गुरुवारी पहाटे अडीच ते सकाळी साडेआठ वाजेपर्यंत मिरज पूर्व भागात ऐन हिवाळ्यात मोठा पाऊस पडला. आंध्रप्रदेश व ओडिशा दरम्यान चक्रीवादळ स्थिती निर्माण झाली आहे. त्याचा परिणाम महाराष्ट्र मध्येही होत आहे. सांगली जिल्ह्यातील मिरज पूर्व भागासह पूर्ण जिल्ह्यातील काढणीला आलेले व फुलोऱ्यात असणाऱ्या द्राक्ष बागांसाठी व त्या द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांसाठी हा पाऊस नुकसान घेऊन आला आहे. एक पाऊस कोट्यवधी रुपयांचे नुकसान घेऊन आला आहे जणू अशीच स्थिती निर्माण झाली आहे.
मिरज पूर्व भागातील लिंगनूर, खटाव, संतोषवाडी, बेळंकी, सलगरे, जानराववाडी, चाबुकस्वारवाडी, कदमवाडी, शिपुर, एरंडोली, कवठेमहांकाळ तालुक्यातील कोंगनोळी, करोली टी, सराटी, सीमाभागातील बहुतांश वीसभर गावे, एरंडोली पायाप्पाचीवाडी आदि सर्वदूर या अवकाळी आलेल्या पावसाने जोरदार हजेरी लावली आहे.
हवामान तज्ज्ञांच्या अंदाजानुसार आज गुरुवारी पहाटेच पावसास सुरुवात होईल असा अंदाज व्यक्त केला जात होता. त्यानुसार तसे घडलेही आणि चार ते पाच तास पाऊस सकाळ पासून पडला असून अजून 24 ते 48 तास पश्चिम महाराष्ट्रात पावसाची शक्यता कमी अधिक प्रमाणात व्यक्त केली जात आहे. त्यामुळे सलग पडलेल्या पावसात द्राक्ष उत्पादक शेतकरी देशोधडीला लागणार आहेत.
आज गुरुवारी पडलेल्या या चार तासांच्या पावसाने साखर उतरलेल्या, पाणी उतरलेल्या द्राक्ष घडात पाणी पसरणार अशात ऊन पडले की द्राक्ष मणी तडकणार आणि पुन्हा कुजणार. ही स्थिती निर्माण झाली आहे. तसेच काही घडात पाणी साचून ते बाहेर न पडल्याने फळकुज सुरू होणार. फुलोऱ्यात असणाऱ्या बागांमध्ये सर्व फुलोरा गळून जाणार. त्यामुळे घडावर फक्त देठ शिल्लक राहणार आहे. उद्यापर्यंत या नुकसानीचे स्वरूप स्पष्ट होणार आहे. पण मिरज पूर्व भागात सुद्धा कोट्यवधी रुपयांचे नुकसान संभवत आहे. एकरी तीन ते पाच लाख किमान नुकसानीचा आकडा वर्तवला जात आहे.
रात्रभर द्राक्षबागायदार झोपला नाही
मागील दहा महिने कष्टाने फुलवलेली द्राक्ष बाग एका रात्रीत नुकसानीच्या खाईत जाणार या चिंतेने भागातील द्राक्ष उत्पादक बळीराजा झोपलाच नाही. रात्री पासूनच पाऊस आला तर सकाळी काय करायचे ? बागेला कसे वाचवता येईल? किती प्रमाणात वाचवता येईल? याबाबत द्राक्ष पीक मार्गदर्शन करणारे बागायतदारांना फोन करत होते. या अवकाळी पावसामुळे बागायतदार चिंताग्रस्त झाल्याचे दिसून येत आहे.
इस्लामपूर: पुढारी वृत्तसेवा – बुधवारी रात्रीपासून सुरु असलेल्या अवकाळी पावसाने वाळवा तालुक्यात दैना उडविली आहे. मुसळधार झालेल्या या पावसाने रब्बी पिके, भाजीपाला व द्राक्षे बागांचे मोठे नुकसान झाले आहे. पावसाने ऊस तोडी ठप्प झाल्या असून ऊसतोडणी मजूरांच्या खोपटात पाणी शिरल्या त्यांचा संसार उघड्यावर आला आहे.
गेल्या तीन-चार दिवसापासून तालुक्यात ढगाळ वातावरण होते. बुधवारी रात्रीपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली. रात्रभर पाऊस कोसळत होता त्यामुळे ओढे, नाले तुडूंब भरले होते. गुरुवारी दिवसभरही पावसाची रिमझिम सुरु होती. या पावसामुळे ऊसतोडी ठप्प झाल्या आहेत. अनेक ठिकाणी तोडलेला ऊस व वाहणे शेतातच अडकून पडली आहेत. या पावसाने अनेक भागात ऊसतोडणी मजूरांच्या खोपटांतून पाणी शिरल्याने धान्य व संसारोपयोगी साहित्य भिजले आहे.
मुसळधार पाऊस व वाऱ्यामुळे रब्बी ज्वारीची पिकेही भुईसपाट झाली आहेत. भाजीपाला व द्राक्षे पिकांचेही मोठे नुकसन झाले आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग कोलमडून गेला आहे.
हेही वाचा :