नागपुर; पुढारी वृत्तसेवा : नागपूरसह पूर्व विदर्भात पावसाचा जोर कायम आहे. मुसळधार पावसामुळे नदी नाले ओव्हरफ्लो झाले आहेत. अनेक ठिकाणी पुरामुळे अडकलेल्या नागरिकांची बचाव पथकाने सुटका केली आहे. भंडारा जिल्ह्यातील देव्हाडा (ता. तुमसर) येथील नृसिंह मंदिरात अडकलेल्या सुमारे १५ भाविकांची गुरूवारी सकाळी सुखरूप सुटका करण्यात आली. गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यातील २ हजार १०३ नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. तर भामरागड तालुक्यातील पर्लकोटा नदीला पूर आल्याने ३०० गावांचा संपर्क तुटलेला आहे. दरम्यान, ब्राम्हणीनाला पुलावरून वाहून गेलेल्या स्कॉर्पिओतील बेपत्ता तिघांचे मृतदेह कोल्हार तिळंगी परिसरात आढळून आले आहेत.
नागपूर जिल्ह्यात गेल्या २४ तासांमध्ये ९१.९० मिलिमीटर पाऊसाची नोंद झाली. जिल्ह्यात १२ जुलै पर्यंत सुमारे ३५७ मिलिमीटर पाऊस कोसळला आहे. सरासरीपेक्षा हा पाऊस अधिक आहे. जिल्ह्यातील १३ मध्यम धरणे ६५ टक्केहून अधिक भरली असुन तीन प्रकल्प शंभर टक्के भरले आहेत. वैनगंगा नदी पुलावरून १ फूट पाणी वाहत असल्याने गोंडपिंपरी-आष्टी मार्ग दोन्ही बाजूंनी बंद करून पोलिस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे.
गेल्या २४ तासांत जिल्ह्यातील दहा लोकांचा मुसळधार पावसामुळे मृत्यू झाला. सावनेर तालुक्यातील पटाका खेरी नाल्यातून एक जण वाहून गेला. मानकापूर येथील साईनगर नाल्यांमध्ये ३३ वर्षीय योगेश राऊत हा तरूण वाहून गेला आहे. काटोल तालुक्यातील इसापूर येथील चिखली तलावात एकाचा बुडून मृत्यू झाल्याची तर पेठ बुधवार येथील दत्तू मधुकर राजूरकर ही ३९ वर्षीय व्यक्ती वाहून गेल्याची घटना घडली आहे.
पुरामुळे काटोल-वरूड मार्ग बंद झाला आहे. गडचिरोली जिल्ह्यात आलापल्ली-भामरागड मार्गासह ११ मार्ग बंद आहेत. तर शेकडो गावांचा संपर्क तुटलेला आहे. सिरोंचा व अहेरी तालुक्यातील १७७ कुटुंबांतील २ हजार १०३ नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. भामरागड तालुक्यातील पर्लकोटा नदीला पूर आल्याने तालुक्यातील ३०० गावांचा संपर्क तुटलेला आहे. पुढील तीन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला असून नागरिकांनी आवश्यक नसेल तर घराबाहेर पडू नये, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.
हेही वाचा :