पुढारी ऑनलाईन डेस्क: मंगळवार २३ मेपासूनउत्तर-पश्चिम भारतात नवीन वेस्टर्न डिस्टर्बन्स अर्थात पश्चिमी चक्रावात सक्रिय होत आहे. तसेच वायव्य भारतात आर्द्रतेचे प्रमाण अधिक आहे. राजस्थानमधील तापमान देखील कमी झाले आहे. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून तीव्र असलेली देशभरातील उष्णतेची लाट काही प्रमाणात ओसरेल (HeatWave Relief ) , असा अंदाज भारतीय हवामान विभागाने आज (दि.२२) दिलेल्या बुलेटिनमध्ये व्यक्त केला आहे.
भारतीय हवामान विभागाच्या शास्त्रज्ञ सोमा रॉय यांनी 'एएनआय'ला दिलेल्या माहितीत सांगितले की, मंगळवार २३ मेपासून वायव्य भारतात नव्याने चक्रीय वादळ सक्रिय होत असून, देशात उष्णतेच्या लाटेपासून आराम मिळणार आहे. झारखंड वगळता देशातील उर्वरित भागातील उष्णतेची लाट ओसरणार (HeatWave Relief) असल्याचेही रॉय यांनी नमूद केले आहे.
भारतीय हवामान विभागाकडून आज (दि.२२) भारतातील दक्षिण हरियाणा, दिल्ली, दक्षिण उत्तरप्रदेश, उत्तर मध्य प्रदेश, झारखंड, बिहार आणि बंगालमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान उद्यापासून ही उष्णतेची लाट हळूहळू ओसरेल (HeatWave Relief ), असे देखील हवामान विभागाने सांगितले आहे.