नवी दिल्ली ; पुढारी वृत्तसेवा : सोलो परफॉरमन्स स्पर्धेत देशाला पहिले ऑलिम्पिक पदक मिळवून देणारे दिग्गज कुस्तीपटू खाशाबा जाधव यांना पद्म पुरस्कार देण्याची मागणी जोर धरू लागली आहे. बुधवारी आज (दि.२२) खाशाबा जाधव यांचे पुत्र रणजीत खाशाबा जाधव यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची भेट घेऊन खाशाबा जाधव यांना मरणोत्तर पद्म पुरस्कार देण्याची मागणी केली. (khashaba jadhav)
रणजीत जाधव म्हणाले की, केंद्रीय मंत्र्यांनी या विषयावर क्रीडा मंत्रालयाशी चर्चा करू आणि कुस्तीपटू खाशाबा जाधव यांना पद्म पुरस्कार देण्यास मान्यता देण्याची शिफारस करू, असे आश्वासन दिले आहे.
खाशाबा जाधव यांनी ऑलिम्पिक पदक जिंकून देश आणि महाराष्ट्राचा गौरव केला होता. देशासाठी पदक जिंकणारा तो पहिला खेळाडू होता. एकेरी स्पर्धेत देशाला पहिले पदक मिळवून देण्याचा मानही खाशाबा जाधव यांच्या नावावर आहे.
पै. खाशाबा जाधव यांना हेलसिंकी ऑलिम्पिकमध्ये ५२ किलो वजनी गटात फ्री स्टाईल क्रीडा प्रकारात कांस्य पदक मिळाले होते.
दुर्दैवाने देशासाठी ऑलिम्पिकमध्ये पहिले पदक मिळवून दिल्यानंतरही आजपर्यंत जाधव यांना भारतरत्न पुरस्कार देण्याची मागणी प्रलंबितच आहे.
त्याचबरोबर ३० जून २००९ रोजी राज्य शासनाने ऑलिम्पिकवीर जाधव राष्ट्रीय प्रशिक्षण केंद्रास मान्यता दिली होती.
गोळेश्वरनजीक होणार्या या क्रिडा संकुलाचे काम त्वरित मार्गी लागून जिल्ह्यासह राज्यातील कुस्ती शैकिनांसह मल्लांना मोठा फायदा होईल, अशी अपेक्षा होती.
मात्र ही अपेक्षा फोल ठरली आहे. आज देशाला ऑलिम्पिकमध्ये सात पदके मिळाली असूनही दुर्दैवाने महाराष्ट्रातील एकाही खेळाडूचा त्यात समावेश नाही.
इतकेच काय पण देशात वैयक्तिक क्रीडा प्रकारात महाराष्ट्रातील स्व. खाशाबा जाधव यांनी १९५२ च्या ऑलिम्पिकमध्ये पदक मिळाल्यानंतर आजवर एकही पदक महाराष्ट्रातील खेळाडूंना मिळालेले नाही.
स्व. जाधव यांची जयंती व पुण्यतिथीला युवा पिढीला प्रोत्साहन मिळेल, अशा उपक्रमांचे शासनाकडून आयोजन होत नाही.
याशिवाय खाशाबा जाधव यांच्या नावाने होणारी राष्ट्रीय कुस्ती स्पर्धाही दोन वर्षापासून झालेली नाही.
त्यामुळे ही स्पर्धा व्हावी तसेच राष्ट्रीय प्रशिक्षण केंद्राचे काम मार्गी लागावे, या मागणीसाठी सोमवार, २३ ऑगस्टला उपोषण केले जाणार असल्याचे पै. सचिन पाटील यांनी सांगितले असून स्थानिक प्रशासनालाही याबाबतचे निवेदन देण्यात आले आहे.