पुढारी ऑनलाईन डेस्क : गजानन किर्तीकरांना (Gajanan Kirtikar) आमच्या शुभेच्छा आहेत. ते आमचे ज्येष्ठ सहकारी आहेत. पक्षाने गजानन यांना या वयात काय दिलं नाही. अशा शब्दात ठाकरे शिवसेना पक्षातून गेलेल्या आणि बाळासाहेबांची शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केलेल्या गजानन किर्तीकरांबद्दल शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut ) यांनी नाराजी व्यक्त केली आहे. आज सकाळी ते माध्यमांशी बोलत होते.
काल (दि.११) मुंबईतील रवींद्र नाट्य मंदिरात एका कार्यक्रमात ठाकरे शिवसेना गटातील खासदार गजानन कीर्तिकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत बाळासाहेबांची शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी रामदास कदम आणि आनंदराव अडसूळ हे देखील उपस्थित होते. पण कीर्तिकर यांचे पुत्र अमोल कीर्तिकर (Amol Kirtikar) हे मात्र ठाकरे शिवसेने बरोबर राहण्याच्या निर्णयावर ठाम आहेत. शिवसेनेने त्यांची शिवसेना उपनेते पदावर नियुक्ती केली आहे. अमोल यांचं असं म्हणणं आहे की, मी वडिलांना समजवण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी माझा निर्णय हा वैयक्तिक असल्याचं सांगितलं.
गजानन कीर्तिकर पक्षातून गेल्याने फार मोठी सळसळ झालेली नाही. उद्यापासून लोक त्यांना विसरून जातीलही. किर्तीकररांना आमच्या शुभेच्छा. ते आमचे ज्येष्ठ सहकारी, त्यांना पक्षाने काय दिलं नाही, त्यांना ५ वेळा आमदार, २ वेळा खासदार केलं, दोन्ही मंत्रिमंडळात मंत्री राहिले. असं माध्यमांशी बोलत खासदार संजय राऊत यांनी किर्तीकरांच्या पक्ष प्रवेश निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. ते पुढे असेही म्हणाले, अमोल किर्तीकर ठाकरेंसोबत आहेत. अमोल किर्तीकर कडवट शिवसैनिक आहेत. अमोलने वडिलांना समजावण्याचा प्रयत्न केला. पण ते ऐकले नाहीत, असं त्यांनी सांगितलं. किर्तीकरांचा पक्षबदल हा पक्षासाठी झटका आहे का? यावर ते म्हणाले पार्टीसाठी कोणताही झटका नाही.
न्यायाची व्याख्या काय आहे? मला तुरुंगात चुकीच्या पद्धतीने घातलं, खोट्या आपरोपाखाली मला तुरुंगात टाकण्यात आलं, तरीही मी पक्षाबरोबर आहे. संकटातदेखील मी पक्षासोबत आहे. संकटाच्या काळात जे पक्षासोबत राहतात त्याला निष्ठा म्हणतात. कीर्तिकरांसारखे नेते सर्व काही प्राप्त करून भोगून निघून जातात. तेव्हा या निष्ठेबद्दल लोकांच्या मनात निष्ठा या शब्दाविषयी वेगळी भावना निर्माण होत राहते. पक्षचिन्ह जाऊनही आमचा मोठ्या फरकानं अंधेरी पोटनिवडणुकीत विजय झाला. ही दिशा योग्यच आहे. अंधेरी पोटनिवडणुकीतील विजय हा लोकांचा कौल समजा. आता मशाल, उद्धव ठाकरे आणि शिवसेना पुढे जात आहे, असंही त्यांनी सांगितलं.
भारत जोडो यात्रेबद्दल विचारलं असता ते म्हणाले, आमचे नेते अदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) आणि राहुल गांधी (Rahul Gandhi) हातात हात घालून लोकशाही टिकवण्यासाठी स्वातंत्र्य टिकवण्यासाठी चालले आहेत.
हेही वाचा