फारुखाबाद (उत्तर प्रदेश) : उत्तर प्रदेशातील फारुखाबाद जिल्ह्यातील फतेहगढ येथील जिल्हा कारागृहातील १,१०० हून अधिक कैद्यांना (jail inmates) दिल्या जाणार्या जेवणात मोठा बदल करण्यात आला आहे. येथील कैद्यांना रुचकर जेवण दिले जात असून त्याला भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (FSSAI) कडून फाइव्ह-स्टार रेटिंग मिळाले आहे. FSSAI ने जारी केलेल्या प्रमाणपत्रात म्हटले आहे की, "फतेहगढ, फारुखाबाद येथील जिल्हा तुरुंगाला भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार इट राइट कॅम्पस (Eat Right CAMPUS) म्हणून प्रमाणित केले आहे.." या प्रमाणपत्रावर ५-स्टार रेटिंग आणि 'उत्कृष्ट' असे लिहिले असून ते १८ ऑगस्ट २०२४ पर्यंत वैध आहे.
देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने तुरुंग प्रशासनाच्या कामगिरीबद्दल माहिती देताना, फतेहगढ जिल्हा कारागृहाचे तुरुंगाधिकारी अखिलेश कुमार यांनी पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की, "आम्हाला थर्ड पार्टी ऑडिटनंतर प्रमाणपत्र मिळाले आहे. तुरुंग प्रशासनातील काही कर्मचाऱ्यांना ऑनलाइन प्रशिक्षण देण्यात आले." प्रमाणपत्र मिळण्यापूर्वी स्वच्छता, अन्नाचा दर्जा, FSSAI-प्रमाणित आउटलेट्सकडून तांदूळ, गहू आणि डाळींची खरेदी आणि चांगले कपडे घातलेले कर्मचारी या निकषांचे काटेकोरपणे पालन केले. कैद्यांना तुरुंगात शाकाहारी जेवण दिले जाते, असेही त्यांनी नमूद केले.
"दररोज कैद्यांना वेगवेगळ्या प्रकारचे जेवण दिले जाते. तुरडाळ, मसूर, हरभरा आणि उडीद आदी डाळींचा त्यांच्या आहारात समावेश असतो," असे कुमार यांनी सांगितले. " त्यांच्या नाश्त्याला (breakfast) दोन दिवस चणे (हरभरे) दिले जातात, दोन दिवस पाव-रोटी दिली जाते आणि ३ दिवस डाळ खिचडी दिली जाते. विविध प्रकारच्या डाळींचा वेगवेगळ्या वेगवेगळ्या पदार्थांत समावेश असतो." असेही ते म्हणाले.
पहिल्या, तिसऱ्या आणि शेवटच्या रविवारी संध्याकाळी पुरी भाजी आणि हलवा दिला जातो. दुसऱ्या रविवारी कढी-भात दिला जातो. ३०-३५ कैदी स्वयंपाक बनवितात असेही त्यांनी नमूद केले. सध्या येथील जिल्हा कारागृहात १ हजार १४४ कैदी आहेत. जसे रेस्टॉरंटमध्ये शेफ स्वच्छ वातावरणात ऍप्रन घालून जेवण बनवतात त्याचप्रमाणे तुरुंगातील कैदी देखील स्वच्छ वातावरणात जेवण बनवतात. जेवण बनवणाऱ्यांची नखे आणि केस कापलेली आहेत का हे नेहमी पाहिले जाते. अशीही माहिती तुरुंग अधिकाऱ्यांनी दिली.
स्वयंपाकाच्या पारंपारिक पद्धतीत बदल केला असून आता रोटी मशिन, कणिक मळण्याचे मशीन आणि भाजीपाला कटिंग मशिन्सचा वापर केला जात आहे. दररोज शिजवलेले अन्न तपासले जाते आणि कैदीही त्यांना मिळणाऱ्या जेवणावर समाधानी असल्याचा दावा त्यांनी केला आहे. स्वातंत्र्य दिनानिमित्त विशेष मेजवानी आयोजित करण्यात आली होती आणि जिल्हा दंडाधिकार्यांनी पहिल्या पंगतीला जेवण वाढले. तुरुंगातील कर्मचारी आणि कैदी एकत्र बसून जेवले." अशी माहिती तुरुंग अधीक्षक भीमसैन मुकुंद यांनी दिली. ते १७ नोव्हेंबर २०२१ रोजी तुरुंग प्रशासनाच्या सेवेत रुजू झाले आहेत.
हे ही वाचा :