पुढारी ऑनलाईन डेस्क : सध्या सर्वत्र कडाक्याच्या थंडी पडली आहे. गुलाबी थंडी सर्वांनाच हवीहवीशी वाटते. हिवाळा ऋतू आरोग्य संवर्धक मानला जातो. मात्र थंडीच्या दिवसांत अनेक व्याधीही डोकेवर काढतात. ( Bathing during winters ) थंडीच्या दिवसांत भल्या सकाळी उठून आंघोळ करणे म्हणजे एक दिव्यच असते. या दिवसातही काही जण नेहमीप्रमाणे थंड पाण्याने किंवा अति गरम पाण्याने आंघोळ करतात. जाणून घेऊया कडाक्याच्या थंडीत आंघोळ करताना कोणती काळजी घ्यावी याबाबत…
थंडीच्या दिवसात रक्तवाहिन्या आखडल्या जातात. त्यामुळे रक्तदाब वाढण्याची शक्यता अधिक असते. हृदयावर अतिरिक्त ताण येऊन हृदयविकाराचा त्रास होण्याची शक्यता असते. त्यामुळे अतिथंड किंवा अति गरम पाण्याने आंघोळ करणे टाळणे आरोग्याच्या दृष्टीने लाभदायक ठरते.
वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, थंडीच्या दिवसात कोमट पाण्याने आंघोळ करणे सुरक्षित आहे. कोमट पाणी शरीराचे तापमान कायम ठेवते. यामुळे शरीराचे तापमान वाढत नाही. तसेच कोमट पाण्यामुळे शरीरातील रक्ताभिसरण चांगले होते. यामुळे कोमट पाण्याने आंघोळ करणे आरोग्यासाठी लाभदायक ठरते.
कडाक्याच्या थंडीत जेव्हा शरीराचा थंड पाण्याशी संपर्क होतो. तेव्हा पूर्ण शरीर कंपन पावते. तज्ज्ञांच्या मते, जेव्हा आपले शरीर थंड पाण्याच्या संपर्कात येते, तेव्हा शरीर कंप पावते. रक्ताभिसरण वेगाने होऊ लागते. शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांना रक्त पुरवठा करण्यासाठी हृदय वेगाने पंप करायला लागते. या परिस्थितीत त्वचेजवळ रक्ताभिसरण रोखल्याने शरीर कंप पावू लागते. त्यावेळी हृदयावर मोठा ताण येतो.काही संशोधनातून समोर आले आहे की, थंडीच्या दिवसांत थंड पाण्याने आंघोळ केल्याने मेटाबॉलिज्म आणि रोगप्रतिकारक शक्तीत वाढ होते. त्यामुळे काही फिटनेस फ्रीक लोकांकडून थंड पाण्याने आंघोळ करण्यास पसंती दिली जाते; परंतु त्यांच्या लक्षात येत नाही की, हे पूर्णपणे फिट लोकांसाठीच हितकारक ठरते. मात्र ज्यांना हृदयविकाराचा त्रास असतो त्यांनी अति थंड पाण्याने आंघोळ केल्यास हृदयावर अतिरिक्त ताण येतो. हृदयाचे ठोके अनियमित होण्याचा धोका असतो. परिणामी हृदयविकाराचा धोका वाढण्याची अधिक शक्यता असते.
थंडीच्या दिवसात अति गरम पाण्याने आंघोळ केल्याने रक्तदाब कमी होतो. आणि हृदयावरील ताण वाढत जातो. त्यामुळे थंडीच्या दिवसात आंघोळीसाठी कोमट पाण्याचा वापर करणे आवश्यक आहे. आंघोळीला सुरुवात करण्यापूर्वी आधी पायावर पाणी घ्यावे. त्यानंतर डोक्यावर पाणी घ्यावे. तसेच आंघोळ झाल्यानंतर टॉवेलने शरीर कोरडे करणेही आवश्यक आहे.
तज्ज्ञांच्या मते, थंडीत हृदयविकाराचा धोका कमी करण्यासाठी संतलित आणि कमी आहार घेणे फायदेशीर ठरते. उबदार कपडे परिधान केले पाहिजेत. त्याचबरोबर नियमित व्यायाम करणे गरजेचा आहे. काही व्याधी असल्यास नियमित औषधे घेतली पाहिजेत. नियमित आरोग्य तपासणी करून वैद्यकीय तज्ज्ञांच्या सल्ल्याने औषधे घेणे आवश्यक आहे.
हेही वाचा :