Latest

Electricity Rates: विजेचे दर बदलणार, वीज दिवसा स्वस्त आणि रात्री महागणार!

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन: केंद्र सरकार वीज दरासंदर्भात नवीन नियम बनवणार आहे. ऊर्जा मंत्रालयाने शुक्रवारी सांगितले की, येत्या काही दिवसांत, भारतातील नवीन वीज नियमांमुळे दिवसा वीज दरात २० टक्क्यांपर्यंत कपात होईल तर रात्रीच्या वेळेत २० टक्क्यांपर्यंत वाढ होईल. नूतनीकरणक्षम ऊर्जेच्या वापराला चालना देण्याच्या उद्देशाने हे पाऊल उचलल्याचे मंत्रालयाने म्हटले आहे.

या प्रणालीच्या मदतीने विजेचा वापर सर्वाधिक होत असताना, ग्रीडवरील मागणी कमी होणे अपेक्षित आहे. विशेषत: जेव्हा अनेक भारतीय कुटुंबे कामानंतर एअर कंडिशनर वापरायला सुरूवात करतात. हा नियम एप्रिल २०२४ पासून व्यावसायिक आणि औद्योगिक ग्राहकांसाठी आणि एक वर्षानंतर कृषी क्षेत्र वगळता इतर बहुतांश ग्राहकांसाठी लागू होईल. केंद्रीय ऊर्जा मंत्री आर के सिंह यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, सौर ऊर्जा स्वस्त असल्याने दिवसा वीज वापरताना दर कमी होतील, त्यामुळे ग्राहकांना याचा फायदा होईल.

ते पुढे म्हणाले, संध्याकाळ किंवा रात्री जेव्हा दिवसाचा प्रकाश नसतो तेव्हा थर्मल आणि हायड्रोपॉवर तसेच गॅस-आधारित क्षमतेचा वापर केला जातो. त्यांची किंमत सौर उर्जेपेक्षा जास्त आहे. हे दरपत्रकात दिसून येईल. २०३० पर्यंत गैर-जीवाश्म इंधनांपासून आणि २०७० पर्यंत निव्वळ शून्य उत्सर्जनापासून ६५ टक्के ऊर्जा क्षमता साध्य करण्याच्या उद्दिष्टाच्या दिशेने भारताला काम करण्यास मदत होईल अशी अपेक्षा आहे, असे देखील केंद्रीय ऊर्जा मंत्री आर के सिंह यांनी म्हटले आहे.

हेही वाचा:

SCROLL FOR NEXT