पुणे : भारताची गुपिते पाकिस्तानच्या हाती देणार्या डीआरडीओ दिघी येथील शास्त्रज्ञ डॉ. प्रदीप मोरेश्वर कुरुलकर वापरत असलेला लॅपटॉपऐवजी डीआरडीओने भलताच लॅपटॉप एटीएसच्या हाती देत खळबळ उडवून दिली होती. ही बाब एटीएसने लक्षात आणून दिल्यानंतर अखेर कुरुलकरच्या ताब्यातील लॅपटॉप डीआरडीओने एटीएसकडे सोपविला. या प्रकरणात काहीतरी काळेबेरे असल्याची शक्यता दैनिक 'पुढारी'ने व्यक्त केली होती. विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, डीआरडीओने थेट न्यायाधीशांकडे अर्ज करून तो लॅपटॉप परत करण्याचा अर्ज केला असल्याचे समजते.
हनिट्रॅपच्या जाळ्यात अडकलेला डीआरडीओचा (संरक्षण संशोधन व विकास संस्था) शास्त्रज्ञ डॉ. कुरुलकर याने देशाच्या सुरक्षेस धोका निर्माण होईल, असे कृत्य केले होते. पिनाका, विभव मिसाईल, रॉकेट लॉन्चरचे तंत्रज्ञान पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेस दिल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्याला 3 मे रोजी एटीएसने (दहशतवादी विरोधी पथक) अटक केली होती.
कुरुलकरच्या देशद्रोही कृत्याची कुणकुण लागताच डीआरडीओने तो वापरत असलेला मोबाईल, एक लॅपटॉप आणि त्या डिव्हाइसचे अन्य साहित्य जप्त करून एटीएसकडे सोपवत रीतसर तक्रारही दाखल केली होती. एटीएसने पुण्यातील न्यायवैद्यक प्रयोगशाळेच्या म्हणजेच फॉरेन्सिक लॅबकडे लॅपटॉपसहित अन्य साहित्य तपासणीसाठी दिले होते. त्या तपासणीत डीआरडीओने सोपविलेला लॅपटॉप हा भलताच
असल्याचे निष्पन्न झाले.
त्यामुळे एटीएसने डीआरडीओच्या दिल्लीस्थित व्हिजिलन्स अँड सिक्युरिटी विभागाचे संचालक कर्नल प्रदीप राणा यांना ही बाब पत्राद्वारे कळविली होती. राणा यांनी याची दखल घेत एटीएसच्या अधिकार्यांना तातडीने दिल्लीला बोलावून घेतले. त्या भेटीत एटीएसच्या अधिकार्यांनी आपल्याकडे सोपविलेल्या लॅपटॉपमध्ये कुरुलकरच्या हेरगिरीबाबत काहीही आढळलेले नसल्याचे दाखविले तसेच त्या लॅपटॉपचा युजर आयडीही कुरुलकर नसून सुधीर के. मिश्रा असल्याचेही स्पष्ट करून विस्तृत माहिती दिली होती.
परिणामी, आपली चूक डीआरडीओने मान्य केली आणि कुरुलकरचा लॅपटॉप सीलबंद करून 26 मे रोजी एटीएसच्या ताब्यात दिला होता. एटीएसने कुरुलकरचा लॅपटॉप न्यायवैद्यक प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी दिला. या लॅपटॉपची तपासणी करून त्याबाबतचा अहवाल या प्रयोगशाळेने एटीएसच्या महासंचालकांकडे पाठविल्याचे सूत्रांनी सांगितले.
विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, डीआरडीओने थेट न्यायाधीशांकडे अर्ज सादर करून तो दिलेला लॅपटॉप आम्हाला परत करावा, अशी विनंती केली आहे. म्हणजेच, दै. 'पुढारी'ने यासंदर्भात बातम्यांतून व्यक्त केलेली शंका बरोबर असल्याचे बोलले जात आहे. याप्रकरणी आता न्यायालय काय निर्णय घेते? त्याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा