नागपूर ; पुढारी वृत्तसेवा सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे गटावर वेळकाढूपणाचा आरोप केला. फडणवीस सध्या नागपुरात आहेत. सत्तासंघर्षाची सुनावणी पाच सदस्यीय खंडपीठापुढे होणार असल्याविषयी प्रतिक्रिया देताना ते म्हणाले की, उद्धव ठाकरेंची शिवसेना वेळकाढूपणा करण्यासाठी ७ न्यायमूर्तींच्या घटनापीठाची मागणी करत आहे. वर्षभर हा निकालच लागू नये असे एकंदरीत त्यांचे वेळकाढूपणाचे धोरण होते. त्याच धर्तीवर हा निकाल आला आहे.
आता यावर नियमित सुनावणी होऊन अंतिम निर्णय लागेल. राबिया प्रकरणावरील निर्णयावर पुनर्विचार व्हावा, म्हणून ७ न्यायमूर्तींच्या पीठाकडे प्रकरण पाठविण्याची मागणी देखील संयुक्तिक नाही. आम्ही गुणवत्तेवर हे प्रकरण ऐकू. त्यानंतर अंतिम निर्णय द्यायचा की ७ न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे पाठवायचे ते आम्ही ठरवू, असेही न्यायालयाने नमूद केल्याचे फडणवीस म्हणाले.
दरम्यान,खा.संजय राऊतांच्या आरोपावर छेडले असता, आपल्याला कारागृहात ठार मारण्याचा कट होता, असा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला. त्यावर बोलताना फडणवीस म्हणाले की, संजय राऊत काहीही आरोप करू शकतात. ते दिवसातून तीनवेळा आरोप करतात. सकाळी कोणता आरोप केला, हे त्यांच्या संध्याकाळी लक्षात राहत नाही. त्यामुळे त्यानी काही वक्तव्य केले यावर मी काय उत्तर देणार, असा खोचक सवाल फडणवीस यांनी उपस्थित केला.
हेही वाचा :