पुणे : पुढारी वृत्तसेवा : उपमुख्यमंत्री अजित पवार आता पुणे जिल्ह्यात लक्ष घालणार असून, त्यामुळे रखडलेल्या प्रकल्पांना गती मिळणार आहे. पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्पाचे काम कोणी करायचे यावरून प्रकल्प रखडला आहे. याबाबतही पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा केली आहे. त्यावर दिल्लीत आल्यानंतर सविस्तर चर्चा करू, असे आश्वासन मोदी यांनी दिले आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
महसूल सप्ताहाच्या शुभारंभानंतर पवार माध्यमांशी बोलत होते. पुणे शहर व परिसराच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वाकांक्षी असलेल्या पुरंदर विमानतळ, पुणे नाशिक ग्रीन कॅरिडॉर, रिंगरोड यांसारख्या प्रकल्पांना गती देण्यासाठी दर आठवड्याला आपण बैठक घेणार असल्याचेही अजित पवार यांनी सांगितले. पवार म्हणाले, पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्पासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलणे झाले आहे. पंतप्रधानांशीही बोलणे झाले.
ते म्हणाले, दिल्लीत आल्यानंतर बोलू, असे सांगितले. तर पुरंदर विमानतळाच्या जागेवरून वाद आहेत. पुणे शहराला आंतरराष्ट्रीय विमानतळाची आवश्यकता असून, विमानतळाचे काम लवकर सुरू होणे गरजेचे आहे. गेली एक वर्ष मी विरोधी पक्षात होतो. आज दुपारीच मला या गोष्टींवर बोलायचे होते. परंतु पंतप्रधानांच्या कार्यक्रमात वेळ कमी होता. यानिमित्ताने पुणेकरांना मी आश्वासित करू इच्छितो, पुणे शहराच्या दृष्टीने जे जे प्रकल्प महत्त्वाचे आहेत, ते मार्गी लावण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे.
पुणे-नाशिक रेल्वेसाठी तिन्ही जिल्ह्यांच्या जिल्हाधिकार्यांना निधी पाठविला आहे. रिंगरोडच्या भूसंपादनासाठी निधी दिला आहे. मेट्रो प्रकल्प सुरू झाला असला, सार्वजनिक वाहतूक सक्षम करण्यासाठी पीएमपी बसेससाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. छत्रपती संभाजी महाराज समाधीस्थळ, शेतीचे आणि पुण्याच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, अशा अनेक विषयांवर महापालिका, पीएमआरडीए आणि जलसंपदा विभागाच्या अधिकार्यांशी मी आजच चर्चा केली आहे. 200 पेक्षा अधिक आमदारांचे पाठबळ या सरकारला आहे, त्यामुळे लवकरच हे प्रकल्प मार्गी लागतील, असेही ते म्हणाले. पवार म्हणाले, राज्यात महत्त्वाच्या पदावर गेल्यानंतर केंद्र सरकारशी संबंधित अनेक प्रकल्प असतात. ते वेळेत मार्गी लागावेत, यासाठी दिल्लीला जावे लागते.
दर आठवड्याला घेणार बैठक
पालकमंत्री कधी होणार असे विचारले असता, अजित पवार म्हणाले, सुदैवाने मुख्यमंत्र्यांनी माझ्याकडे अर्थखाते दिले आहे. मी उपमुख्यमंत्रीसुद्धा आहे. त्यामुळे मला बैठका घेण्याचा अधिकार आहे. प्रकल्पांचा आढावा घेण्याचादेखील अधिकार आहे. अर्थमंत्री म्हणून निधी वाटपाचे अधिकारदेखील मला आहेत. त्यामुळे या सर्व प्रकल्पांना बळ मिळाल्याचे तुम्हाला लवकरच दिसेल, असा विश्वास अजित पवार यांनी व्यक्त केला.
जिल्हाधिकार्यांनी चांगले काम केले
पुणे जिल्हाधिकारी म्हणून डॉ. राजेश देशमुख यांनी चांगले काम केले असून, त्यांनी अनेक प्रकल्प मार्गी लावले आहेत. चांदणी चौकातील काम असो की, रिंगरोड भूसंपादनाचे ते सुरू केले आहे, असे पवार महसूल दिनाच्या कार्यक्रमात म्हटले आहेत.
हेही वाचा :