पुढारी वृत्तसेवा, नवी दिल्ली दि 16, Delhi Flood : यमुना नदीतील पाण्याची पातळी हळूहळू ओसरू लागल्याने दिल्लीकर नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे. मात्र आगामी काळात राजधानीत रोगराई पसरण्याच्या शक्यतेने आरोग्य खात्याची मात्र झोप उडाली आहे. दरम्यान यमुना नदीची पाणी पातळी कमी झाली आहे.
उत्तर दिल्लीला पुराचा मोठा तडाखा बसला होता. ज्या भागात पाणी ओसरले आहे, त्या भागातील लोक आपापल्या घराकडे परतू लागले आहेत. काश्मिरी गेटजवळील मॉन्टेसरी बाजारात बरेच पाणी साचून राहिले होते. त्यामुळे या भागात चिखल आणि दलदलीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. दरम्यान विदेश दौऱ्यावरून परत आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपराज्यपालांशी संवाद साधत पूर परिस्थितीच्या अनुषंगाने चर्चा केली.
आयटीओ जवळच्या धरणाचे 32 पैकी 4 दरवाजे बंद पडले होते. ते उघडण्यासाठी नौदलाची मदत घेण्यात आली असून एक दरवाजा उघडण्यास नौदलाला यशही आले आहे. रविवारी सकाळी यमुना नदीची पाणी पातळी 205.98 मीटर इतकी होती. गेल्या गुरुवारी ही पातळी उच्चांकी स्तरावर म्हणजे 208.66 मीटरवर होती. मंजू का टिला ते काश्मिरी गेटपर्यंतच्या रस्त्यावरील पाणी ओसरू लागले आहे. पाऊस पूर्ण थांबला तर नदीची पाणी पातळी वेगाने कमी होईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पूरग्रस्त भागाचा दौरा करून लोकांना आवश्यक ती मदत करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले.