मुंबई; पुढारी वृत्तसेवा : Day Care Centre : नोकरीनिमित्त आई-वडिलांना घराबाहेर जावे लागत असल्यामुळे मुलांची काळजी घेण्याबाबत सध्या असलेल्या पाळणाघरांबाबत राज्यात लवकरच धोरण आखले जाणार आहे. मुंबई शहर व उपनगरात खासगी स्वरूपात पाळणाघरे (डे केअर सेंटर) सुरू करण्याबाबत मंत्रालयात आयोजित केलेल्या बैठकीत महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी ही माहिती दिली.
राज्यात पाळणाघर योजनेबाबत राज्य शासनाची नियमावली तसेच ही योजना राबविताना शासकीय तसेच अशासकीय संस्थांचेही मत विचारात घेण्यासाठी शालेय शिक्षण विभाग, कामगार विभाग, गृह विभाग आणि महिला व बालविकास विभागाची संयुक्तरीत्या बैठक घेणार आहे. चौथ्या महिला धोरणात पाळणाघराबाबत निर्णयाचा समावेश केला आहे.
आगामी महिला धोरणात पाळणाघराबाबत सकारात्मक विचार करण्यात येईल. फक्त शहरीच नाही तर ग्रामीण भागातील 0 ते 6 व 6 ते 18 वयोगटातील मुलांसाठी पाळणाघर सुरू करावे, अशी सूचना विविध सामाजिक संस्थांनी केली आहे.ज्या मुलांचे पालक नोकरी अथवा कामानिमित्त बाहेर आहेत, अशा मुलांसाठी कौटुंबिक व सुरक्षित वातावरणात संगोपन होण्यासाठी पाळणाघर ही संकल्पना काळाची गरज आहे. याबाबत शासन सकारात्मक निर्णय घेईल, असेही तटकरे यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्र राज्य बाल हक्क आयोगाच्या अध्यक्षा डॉ. सुशिबेन शहा म्हणाल्या, आजही मुलांना सुरक्षित निवारा उपलब्ध नसल्यामुळे नोकरी करणार्या महिलांसमोर मोठा प्रश्न असतो. ग्रामीण व शहरी भागात जास्तीत जास्त डे केअर सेंटर सुरू झाल्यास बालकांसाठी सुरक्षित निवार्याची उपलब्धता होणार आहे. Day Care Centre
हे ही वाचा :