पुढारी ऑनलाईन : लोकसभा निवडणुकीपूर्वी आणि होळी सणाच्या तोंडावर केंद्रातील मोदी सरकारने आज गुरुवारी केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठे गिफ्ट दिले. केंद्रीय मंत्रिमंडळाने कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात (DA) ४ टक्के वाढ करण्यास मंजुरी दिली आहे. याचा लाभ ४८.६७ लाख केंद्रीय सरकारी कर्मचारी आणि ६७.९५ लाख पेन्शनधारकांना होणार आहे. आजच्या ४ टक्क्यांच्या वाढीसह महागाई भत्ता ५० टक्क्यांवर पोहोचला आहे. १ जानेवारी २०२४ पासून वाढीव डीए लागू होईल. ही वाढ सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींच्या आधारे करण्यात आली आहे. (7th Pay Commission)
सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींनुसार, डीए ५० टक्क्यांपर्यंत पोहोचल्यास घरभाडे भत्ता, मुलांचा शिक्षण भत्ता, वाहतूक भत्ता आदींमध्येही वाढ होईल. याआधी ऑक्टोबर २०२३ मध्ये केंद्राने ४ टक्के डीए वाढवला होता. यामुळे तो ४२ टक्क्यांवरून ४६ टक्क्यांवर गेला होता. आता डीए ५० टक्क्यांपर्यंत गेला आहे.
जर एखाद्या केंद्रीय कर्मचाऱ्याला १८ हजार रुपये मूळ वेतन (बेसिक-पे) मिळत असेल, तर त्या कर्मचाऱ्याचा महागाई भत्ता सध्याच्या ४६ टक्के दराने ८,२८० रुपये मिळतो. त्यात आता ४ टक्के वाढीसह ५० टक्क्यांनुसार मोजले तर महागाई भत्ता ९ हजार रुपये होईल. म्हणजेच त्यांच्या पगारात ७२० रुपयांची वाढ होईल.
जर आपण कमाल बेसिक-पेच्या आधारावर त्याचे गणित केले तर, तर ५६,९०० रुपये मिळणाऱ्या कर्मचाऱ्याला ४६ टक्के दराने २६,१७४ रुपये डीए मिळतो. आता डीए ५० टक्के झाल्याने तर हा आकडा २८,४५० रुपये होईल. म्हणजेच पगार २,२७६ रुपयांनी वाढणार आहे. (7th Pay Commission)
हे ही वाचा :