पुढारी ऑनलाईन डेस्क : 'मोचा' चक्रीवादळ वेगाने पुढे सरकत आहे. आज मोचाचे तीव्र चक्री वादळात रूपांतर होऊ शकते. त्यामुळे ताशी १३५ किलोमीटर वेगाने वारेही वाहू शकतात. 'मोचा' बांगलादेश-म्यानमार किनार्याकडे सरकू शकते, असा अंदाज व्यक्त केला आहे. भारताच्या हवामान विभागाच्या वरिष्ठ शास्त्रज्ञ मोनिका शर्मा यांनी याविषयी माहिती दिली. एनडीटीव्हीने यासंबंधीचे वृत्त दिले आहे. 'मोचा' चक्रीवादळ सध्या मध्य बंगालच्या उपसागर आणि दक्षिण पूर्व बंगालजवळ आहे. भारतीय हवामान विभाग २७ एप्रिलपासून निरीक्षण करत आहे. भारताला 'मोचा'चा फटका बसणार नाही, असे सुरुवातीला वाटत होते. मात्र, असे नाही. भारतालाही या चक्रीवादळाचा फटका बसू शकतो. वाचा सविस्तर बातमी. (Cyclone Mocha Update)
पश्चिम बंगाल सरकारने 'मोचा' चक्रीवादळामध्ये होणाऱ्या संभाव्य परिणामांचा विचार करता खबरदारी म्हणून उपाययोजना केल्या आहेत. राज्यातील सखल भाग आणि किनारी भागात राहणाऱ्या लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. मोनिका शर्मा म्हणाल्या, मध्य आणि ईशान्य बंगालच्या उपसागराकडे चक्रीवादळ जाईल, त्यामुळे मच्छिमारांनी १२ मे ते १४ मे पर्यंत तेथे जाऊ नये. अंदमानच्या पर्यटकांबाबतही सूचना देण्यात आल्या आहेत. ईशान्य राज्याच्या मुख्य सचिवांना देखील IMD च्या DG द्वारे माहिती दिली जात आहे. आज फक्त अंदमान निकोबारमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हे चक्रीवादळ प्रामुख्याने दक्षिण पूर्व बांगलादेश आणि म्यानमारला प्रभावित करणार आहे. हे चक्रीवादळ १४ तारखेला दुपारी येथून पुढे सरकेल.
IMD नुसार, संध्याकाळी ५:३० वाजता, चक्रीवादळ बंगालच्या उपसागराच्या आग्नेय, पोर्ट ब्लेअरच्या पश्चिमेला सुमारे ५२० किमी आणि कॉक्स बाजारच्या दक्षिण-नैऋत्येस १,१०० किमी अंतरावर येईल. मोखा चक्रीवादळ शुक्रवारी आणखी तीव्र होईल आणि रविवारी (दि.१४) म्यानमारमधील सिटवे या बंदर शहराजवळील कॉक्स बाजार आणि क्यूकप्यू दरम्यान जमिनीवर पडेल, असे हवामान कार्यालयाने सांगितले. त्यामुळे ताशी १७५ किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.
'उत्तर हिंदी महासागरावरील उष्णकटिबंधीय चक्रीवादळांची बदलती स्थिती' या अभ्यासानुसार, अरबी समुद्रात १९८२ ते २०१९ या कालावधीत अत्यंत तीव्र चक्रीवादळांची तीव्रता, वारंवारता आणि कालावधीत लक्षणीय वाढ झाली आहे. अभ्यासानुसार, २००१ ते २०१९ या कालावधीत अरबी समुद्रात चक्रीवादळांची वारंवारता ५२ टक्क्यांनी वाढली आहे. तर बंगालच्या उपसागरात ती आठ टक्क्यांनी कमी झाली आहे.