पुढारी ऑनलाईन : भारतात दिवसेंदिवस कोरोना रूग्णांची संख्या वाढतानाच दिसत आहे. त्यामुळे कोरोनाच्या चाचण्यांमध्ये देखील वाढ करण्यात आली आहे. गेल्या २४ तासात देशात ५ हजार ३५७ कोरोना रूग्णांची नोंद झाली आहे. आत्तापर्यंत देशात एकूण ३२ हजार ८१४ कोरोनाच्या सक्रिय रूग्णांची नोंद करण्यात आली असल्याचे वृत्त एएनआयने दिले आहे.
देशातील कोरोनाचा संसर्ग अधिक जोमाने वाढत आहे. कोरोना उतरणीला लागल्यापासून जवळपास सात महिन्यानंतर (203 दिवस) पुन्हा शुक्रवारी प्रथमच 6 हजार 50 नवे रुग्ण दाखल झाले. आठवडाभरात कोरोनाच्या रुग्णसंख्येत तब्बल 98 टक्क्यांची भर पडल्यामुळे केंद्र सरकार खडबडून जागे झाले आहे. कोरोनाच्या संकटाला समर्थपणे तोंड देण्यासाठी आरोग्य यंत्रणेची सज्जता तपासून पाहण्याकरिता दिनांक 10 व 11 एप्रिल रोजी मॉकड्रिल घेण्याचे आदेश दिले.
देशात कोरोनाच्या रुग्णसंख्येच्या आलेखामध्ये मार्चच्या दुसर्या पंधरवड्यापासून गती आली. 17 मार्चला कोरोनाची दैनंदिन रुग्णसंख्या 571 होती आणि उपचारार्थी रुग्णांची संख्या 15 हजार 119 होती. यानंतर दररोज सरासरी 4 हजार 188 रुग्ण नव्याने दाखल होत आहेत आणि शुक्रवारी ही रुग्णसंख्या 29 हजार 318 वर पोहोचली आहे. देशातील कोरोना संसर्गाचा सरासरी दर 3.0 टक्क्यांवर, तर 8 राज्यामधील 10 जिल्ह्यांत हा दर 10 टक्क्यांंवर आहे. केरळ, महाराष्ट्र, दिल्ली या राज्यांमध्ये रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढते आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी एक आढावा बैठक घेतली होती.
कोरोनाची वाढती प्रकरणे पाहता हरियाणा, केरळ आणि पुद्दुचेरीने मास्क सक्ती केली आहेत. या तिन्ही राज्यातील सरकारने सार्वजनिक ठिकाणी मास्क घालणे अनिवार्य आहे. कोरोना प्रतिबंधासाठी आवश्यक नियमांचे पालन करण्याचे आवाहन सरकारने सर्वसामान्यांना केले आहे. त्यावर लक्ष ठेवण्याचे आदेश शासनाने जिल्हा पंचायत प्रशासनाला दिले आहेत.