आजच्याच दिवशी १९४९ साली भारतरत्न, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील घटना समितीने तयार केलेला मसूदा आपण आपली राज्यघटना म्हणून औपचारिकरित्या स्वीकारली. त्यामुळे आजचा २६ नोव्हेंबर हा दिवस आपण 'संविधान दिन' (Constitution Day 2021) म्हणून साजरा करतो. पण तुम्हाला माहीत आहे का, आपल्या राज्यघटनेचे लेखन कोणी केले? तर प्रसिद्ध कॅलिग्राफर प्रेम बिहारी रायजादा यांनी आपल्या संविधानाचे लेखन केले.
सर्वात मोठा लोकशाही देश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आपल्या भारताची राज्यघटना जगातील सर्वातील मोठी राज्यघटना आहे. राज्यघटना निर्मितीमध्ये डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान मोठे आहे. अथक परिश्रमातून, अभ्यासातून डाॅ. आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली राज्यघटना २ वर्षे ११ महिने आणि १८ दिवसांत तयार करण्यात आली.
विविधतेने नटलेल्या आपल्या भारताला एकत्र बांधून ठेवण्याचं काम आपली ही राज्यघटना (Constitution Day 2021) करते. राज्यघटना ही हस्तलिखीत असावी, अशी पंडीत जवाहरलाल नेहरू यांची होती. राज्यघटना कोणत्या टायपिंगचा किंवा प्रिटिंगचा वापर करुन लिहिण्यात आलेली नव्हती. तर आपली ही राज्यघटना सुंदर आणि वळणदार अक्षरात प्रसिद्ध कॅलिग्राफर प्रेम बिहारी रायजादा यांनी इंग्रजीमध्ये लिहिली होती. तर हिंदीचे मूळ हस्तलिखित राज्यघटना वसंत वैद्य यांनी केले. इंग्रजीमध्ये राज्यघटना लिहिण्यासाठी प्रेम बिहारी रायजादा यांना सहा महिने लागले होते.
विशेष म्हणजे प्रेम बिहारी रायजादा यांनी कोणत्याही प्रकारचे मानधन घेतले नव्हते. पण त्यांनी एक अट घातली होती की, "मला मानधन नको, माझ्याकडे ईश्वर कृपेनुसार सर्व काही आहे. मी माझ्या आयुष्यात आनंदी आहे. पण माझी एक अट आहे. राज्यघटनेच्या प्रत्येक पानावर माझं आणि शेवटच्या पानावर माझं आणि माझ्या आजोबांचं नाव लिहिण्याची परवानगी द्यावी."